डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी हवे कायदेशीर कवच...

डॉक्टरांवरील हल्ले   रोखण्यासाठी हवे कायदेशीर कवच... 


सीने में जलन, आखों मैं तुफान सा क्यो हैं ?
इस शहर मैं हर शक्स परेशान सा क्यो हैं ?

डॉक्टरांवर  वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे किंवा हल्ली जरा  गाडीचा धक्का लागला तर हमरीतुमरीवर येणाऱ्या समाजाकडे बघून मला वरील गाणे आठवले ...

गंभीर जखमी असलेल्या रुग्णावर नीट उपचार व्हावेत म्हणून त्यास मोठ्या हॉस्पटिल मध्ये जाण्याचा सल्ला दिल्याचा राग येऊन धुळे येथील सरकारी हॉस्पिटल मधील निवासी डॉक्टरला बेदम मारहाण झाल्याचा निन्दनीय प्रकार मागील नुकताच घडला.   डॉक्‍टर, रुग्णालये यांच्यावर होणाऱया अश्या  हल्ल्याच्या प्रमाणामध्ये देशभर मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते . जर आता डॉक्‍टरांचे अशा हल्ल्यांपासून रक्षण केले नाही, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. वैद्यकशास्त्रामध्ये रोज काही ना काही नवीन शोध लागत असतात. त्याची व्याप्ती प्रचंड आहे, त्यामुळेच वैद्यकशास्त्र हे सतत विकसित होत असलेले शास्त्र आहे. "दैव जाणिले कोणी" हे उपचारनबाबतीत नक्की लागू पडते .  ‘व्यक्ती तितक्‍या प्रकृती’ असल्याने उपचारांचा परिणामही वेगवेगळा ठरतो. एखाद्या आजारावर उपचार करण्याच्या वेगवेगळ्या; पण मान्यताप्राप्त व वर्षानुवर्षे वापरलेल्या पद्धती असतात. प्रत्येक उपचार पद्धतीला त्याचे फायदे-तोटे असतात, त्यामुळे संबंधित तज्ज्ञ डॉक्‍टरांनी त्यांच्या ज्ञानाचा व कौशल्याचा पुरेपूर उपयोग करूनदेखील जर दुर्दैवाने उपचारास यश आले नाही तर त्याचा दोष डॉक्‍टरांना देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालांमध्ये स्पष्ट केले आहे.
त्याचबबरोबर सर्वोच्च न्यायालयाने निष्काळजीपणापोटी डॉक्‍टरांवर दाखल होणाऱ्या खोट्या गुन्ह्यांबद्दलही  असे म्हटले आहे, की जर प्रत्येकवेळी असे गुन्हे दाखल व्हायला लागले तर डॉक्‍टरांना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजाकरिता करणे अवघड होऊन बसेल व अशाने समाजाचेच प्रचंड नुकसान होईल, हे विधान डॉक्‍टरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबतदेखील तंतोतंत लागू पडेल.
एखाद्या रुग्णाने उपचारास प्रतिसाद दिला नाही किंवा दुसरीकडे उपचार नीट होऊ शकतील असा सल्ला दिला  तर यात डॉक्‍टरांची चूक कशी असू शकेल, याचा विचार न करता एकदम जाऊन डॉक्‍टरांना बेदम मारायचे, हॉस्पिटलची मोडतोड करायची, यातून काहीच साध्य होत नाही. उलट डॉक्‍टरांना रुग्णाबद्दल वाटणारी आपुलकी कमी होते. हे रुग्णांसाठी जास्त धोकादायक आहे.
 याचा अर्थ डॉक्‍टरविरुद्ध काहीच कारवाई करता येत नाही का? तर असे नाही. वैद्यकीय निष्काळजीपणाच्या खटल्यांत आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने संयत निर्णय दिलेले आहेत. योग्य तेथे १२ कोटी रुपयांची नुकसानभरपाईही रुग्णाला दिलेली आहे; तर त्याचबरोबर फौजदारी कारवाईचे निकषदेखील घालून दिलेले आहेत. उजव्या हाता ईवजी डाव्याच हाताचे  ऑपेरेशन  केले, एखाद्या शाखेचे ज्ञान नसतानादेखील त्या शाखेसंदर्भात उपचार केले, अशा प्रकरणांत डॉक्‍टरांना न्यायालयाने जबर दंड अथवा शिक्षा केलेल्या आहेत.

जर एखाद्या रुग्णास वाटले, की डॉक्‍टर निष्काळजीपणे वागले असतील तर संबंधित डॉक्‍टरांविरुद्ध कायद्याच्या चौकटीत राहून दिवाणी तसेच फौजदारी तक्रार दाखल करता येते. असे असूनसुद्धा दंडेलशाहीच्या जोरावर डॉक्‍टरांना लक्ष्य करण्याच्या प्रकारामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे डॉक्‍टरांच्यात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याकरिता डॉक्‍टर संरक्षण कायदा किंवा किमान अध्यादेश  तरी आंध्र प्रदेशच्या आणि  उत्तराखंडच्या धर्तीवर महाराष्ट्रापुरता  आणणे गरजेचे आहे. याकरिता डॉक्‍टरांनी व त्यांच्या शिखर संघटनांनीच पावले उचलण्याची गरज आहे. २००७ सालच्या  आंध्र प्रदेश सरकारच्या   अध्यादेशा प्रमाणे   खासगी अथवा सरकारी रुग्णालये, डॉक्‍टर, कर्मचारी, नर्स, वॉर्डबॉय, मेडिकलचे विद्यार्थी इ.ना या कायद्याच्या संरक्षण कक्षेत आणले आहे. जी व्यक्ती अशा डॉक्‍टर इ.वर हल्ला करेल किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून हल्ला करून घेईल त्या व्यक्तीस या कायद्याखाली दोषी धरून ३ वर्षे कैद आणि/ अथवा रु. ५० हजार दंड अशी शिक्षा होऊ शकते. या कायद्याखालचा गुन्हा हा दखलपात्र व अजामिनपात्र आहे. जर गुन्हेगारामुळे हॉस्पिटलच्या यंत्रसामग्रीचे अथवा मालमत्तेचे नुकसान झाले असेल, तर यंत्रांच्या किमतीच्या दुप्पट रक्कम; तसेच प्रॉपर्टीच्या नुकसानाची न्यायालय ठरवेल ती किंमत संबंधित गुन्हेगाराकडून वसूल करण्याची महत्त्वाची वेगळी तरतूद हे या कायद्याचे वैशिष्ट्य आहे. रक्कम जर तो गुन्हेगार देऊ शकला नाही, तर त्याचे घरदार जप्त करून अशा रकमेची वसुली करता येईल, असेही पुढे म्हटले आहे.
याच धर्तीवर आपल्याकडे कायदा करणे हे गरजेचे झाले आहे. तोपर्यंत  उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करणे डॉक्टरांसाठी गरजेचे झाले आहे. 

सध्या डॉक्टर-पेशंट ह्यांचे नातेसंबंध हे दुष्टचक्रात अडकलेले आहे. परस्पनवरील विश्वास वाढणे हे एकंदरीतच समाज स्वास्थ्याच्या द्रुष्टीने खूप गरजेचे आहे.  धुळ्यासारखे प्रसंग घडत राहिले तर चांगले डॉक्टर मिळणे या पुढे दुरापास्त होईल आणि याचा तोटा समाजाला होईल आणि इंटरनेट च्या अर्धवट माहितीवरून उपचार घायची वेळ येईल !


Adv . रोहित एरंडे.
 ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©