"आई-वडिलांपासून स्वतंत्रपणे राहण्यासाठी टुमणे लावणे आणि सतत आत्महत्येच्या धमक्या देणे हा नवऱ्याचा मानसिक छळच" - मा. सर्वोच्च न्यायालय. - ऍड. रोहित एरंडे ©
" आई-वडिलांपासून स्वतंत्रपणे राहण्यासाठी टुमणे लावणे आणि सतत आत्महत्येच्या धमक्या देणे हा नवऱ्याचा मानसिक छळच" - मा. सर्वोच्च न्यायालय. नाण्याच्या दोन बाजू बघताना.. ॲड. रोहित एरंडे. © लग्नानंतर स्वतःचा संसार थाटून वेगळे राहणे हे आता काही नवीन नाही किंबहुना लग्न ठरविताना विवाह मंडळामधील फॉर्म मध्ये तसा रकाना देखील असतो. समजून उमजून वेगळे राहणे आणि जबरदस्तीने , काहीतरी धमकी देऊन वेगळे राहण्यास भाग पाडणे ह्या मात्र २ वेगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याचदा वेगळे राहण्याचा हट्ट हे डिव्होर्स घेण्यामागचे एक कारण सध्या दिसून येते. असेच एक प्रकरण मा. सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आणि " आई-वडिलांपासून स्वतंत्रपणे राहण्यासाठी टुमणे लावणे आणि सतत आत्महत्येच्या धमक्या देणे हा नवऱ्याचा मानसिक छळच असा निकाल मा. न्यायाधीशांनी अलीकडेच दिला आहे. मात्र ह्यातील "वेगळे राहण्याची मागणी...." हा भाग जास्त चर्चिला गेला. ह्या निकालाची साधक-बाधक चर्चा ह्या लेखाच्या निमित्ताने आपण बघुयात. " लग्नानंतर स्वतंत्र संसार थाटणे हे अजूनही आपल्या संस्कृतीमध्ये बसत नाही. ...