स्त्रियांच्या मिळकतीचे वारस कोण ? - ऍड. रोहित एरंडे. ©

 स्त्रियांच्या   मिळकतीचे वारस कोण ?

माझी  आत्या नुकतीच मरण पावली. तिचे यजमान पूर्वीच मयत झाले आहेत. आत्याला मूलबाळ नव्हते. तिने नोकरी करून जी काही मिळकत कमावली त्या मिळकतींवर आता कोणाचा अधिकार असेल ? आत्याचे सासरचे देखील आता मिळकतीवर हक्क सांगायला लागले आहेत.  कृपया मार्गदर्शन करावे. 


एक वाचक पुणे. 

या संदर्भातील कायदेशीर बाबी आधी थोडक्यात समजावून घेऊ. सर्व प्रथम हे लक्षात घ्यावे कि एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा व्यक्तींच्या हयातीमध्ये  खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच तबदील केला जाऊ शकतो.    तर  एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने (टेस्टमेंटरी सक्सेशन) किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने (इंटेस्टेट सक्सेशन )  तबदील होऊ शकतो. खरेदीखत, बक्षीसपत्र , मृत्युपत्र  ह्यायोगे मिळालेली मिळकत हि त्या व्यक्तीची स्वष्टार्जित / स्वतंत्र मिळकत धरली जाते आणि त्या व्यक्तीच्या हयातीमध्ये त्या व्यक्तीच्या जोडीदाराला किंवा मुलाबाळांना अश्या मिळकतींमध्ये कोणताही मालकी हक्क नसतो.

 स्त्रिया मिळकतीच्या  पूर्ण मालक   !

हिंदू वारसा कायद्याच्या कलम १४ अन्वये  स्त्रियांना  एखादी स्थावर / जंगम  मिळकत वारसाने, वाटपाने, पोटगीसाठी किंवा पोटगीच्या फरकापोटी,  मृत्यूपत्र किंवा बक्षीसपत्र किंवा खरेदीखात अश्या दस्तांनी, स्त्रीधनापोटी इ. प्रकारे  आणि  कोणाकडूनही    मिळाल्यास ती स्त्री  अश्या मिळकतींची संपुर्ण मालक होते.   ह्याला अपवाद म्हणजे अश्या दस्तांनी जर  मिळकतींमध्ये फक्त तहहयात राहण्याचा हक्क (life interest ) दिला असेल तर त्यामध्ये असा मालकी हक्क मिळत नाही.

हिंदू वारसा कायद्याप्रमाणे पुरुष आणि स्त्री  यांच्या स्वकष्टार्जित मिळकतीच्या  विभागणीमध्ये  फरक आहे. जर का एखादी हिंदू स्त्री   मृत्यूपत्र न करता मरण पावली तर तिची मिळकत  कलम १५ (१) प्रमाणे सर्वात प्रथम तिचा नवरा, मुलगा-मुलगी, जर मुलगा -मुलगी आधीच मयत झाली असल्यास त्यांची मुले (नातवंडे) ह्यांच्यामध्ये समानरीत्या विभागली जाईल. ह्यांच्यापैकी कोणीच नसेल तर मग नवऱ्याचे वारसांकडे आणि ते नसतील तर आई-वडीलांकडे , तेही नसतील तर वडिलांच्या वारसांकडे आणि शेवटी आईच्या वारसांकडे मिळकत जाईल. तुमच्या  केसमध्ये तुमच्या  आत्याला मूलबाळ  नसल्यामुळे,  नवराही मयत असल्यामुळे  आणि त्यांनी मृत्युपत्र केले नसल्याने सदरील मिळकत तिच्या नवऱ्याच्या वारसांकडेच जाईल. अश्या वेळी मृत्यूपत्र 'वेळीच करून ठेवण्याचे' महत्व जास्त जाणवते. कारण Will prevails over Succession & Nomination 

महत्वाचा अपवाद :    

कलम १५(२) च्या अपवादाप्रमाणे  जर महिलेला एखादी  मिळकत तिच्या वडील किंवा आईकडून मिळाली असेल आणि ती महिला निपुत्रिक (in absence of any  issue  ) असेल किंवा  तिचे मुलगा-मुलगी किंवा जर मुलगा -मुलगी आधीच मयत झाली असल्यास त्यांची मुले (नातवंडे) ह्यांपैकी कोणीहि   वारस हयात नसेल  तर अशी मिळकत वर कलम १५ (१) मध्ये  नमूद केल्याप्रमाणे   प्रमाणे न विभागली  जाता  केवळ त्या महिलेच्या वडिलांच्या वारसांकडेच  जाईल. तसेच जर का मिळकत नवऱ्याकडून किंवा सासऱ्यांकडून आली असेल आणि वरीलप्रमाणेच ती  निपुत्रिक असेल , तर अशी मिळकत हि त्या स्त्रीच्या मृत्यूनंतर फक्त तिच्या नवऱ्याच्या वारसांकडे जाईल.   'स्त्रीच्या  मृत्यूनंतर अशी मिळकत हि मिळकतीच्या उगमाकडेच जाईल'  हा  कलम १५(२) मधील  वरील  अपवाद पुरुषांबाबत मात्र दिसून येत नाही  !   वारसा कायद्याने पुरुषांच्या स्वकष्टार्जित मिळकतीचे विभाजन कसे होते हा एक स्वतंत्र विषय आहे. 


ऍड. रोहित एरंडे. ©


Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©