अविवाहित व्यक्तींच्या मिळकतीचे विभाजन.. ऍड. रोहित एरंडे. ©

 आम्ही दोघे सख्खे बहीण भाऊ आहोत आणि वय ६० च्या पुढे आहे. आमचे आई-वडील आता हयात नाहीत आणि आम्ही दोघेही अविवाहित आहोत.  तर आमच्या मृत्युनंतर आमच्या  दोघांच्या स्वकष्टार्जित मिळकतीचे विभाजन  कसे होईल ? 

एक वाचक, पुणे. 

*ऍड. रोहित एरंडे. ©*

मिळकतीमधील  हक्क आणि अधिकार या बाबत आपल्याकडे अजूनही म्हणावी तशी जागृती झालेली दिसून येत  नाही. एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा व्यक्तींच्या हयातीमध्ये  खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच तबदील होऊ शकतो .      तर  एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने (टेस्टमेंटरी सक्सेशन) किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने (इंटेस्टेट सक्सेशन )  तबदील होऊ शकतो. खरेदीखत, बक्षीसपत्र , मृत्युपत्र  ह्यायोगे मिळालेली मिळकत हि त्या व्यक्तीची स्वकष्टार्जित / स्वतंत्र मिळकत धरली जाते.  

तर एखादा हिंदू पुरुष आणि स्त्री मृत्यूपत्र न करता मरण पावले तर त्यांच्या स्वकष्टार्जित  संपत्तीची विभागणी वेगवेगळ्या तरतुदींप्रमाणे  होते. ह्यासाठी ढोबळ मानाने  कायद्याने क्लास-१ -हेअर्स (वारस) आणि क्लास-२-हेअर्स (वारस) अशी विभागणी केलेली आढळते. .

*हिंदू पुरुष आणि  मिळकतीचे विभाजन*  :

एखादा हिंदू पुरुष मृत्यूपत्र न करता मरण पावल्यास त्याची स्वकष्टार्जित मिळकत हि  हिंदू  वारसा कायद्याच्या कलम  ८ अन्वये सर्व प्रथम त्याचे क्लास-१ हेअर्स ज्यांच्यामध्ये प्रामुख्याने  त्याची विधवा पत्नी, मुलगा -मुलगी (मुले)  , आई , जर मुलगा -मुलगी आधीच मयत झाली असल्यास त्यांची मुले (नातवंडे), मुलाची विधवा पत्नी (सून)  इ. चा  समावेश होतो, ह्या वारसांना  समान पद्धतीने मिळेल. जर का क्लास-१ वारसांपैकी  कोणीही नसेल, तर मग क्लास-२ वारसांकडे  अशी संपत्ती जाते. क्लास-२ हेअर्स मध्ये प्रामुख्याने वडील, मुलाच्या किंवा मुलीच्या  मुलीचा मुलगा किंवा मुलगी (पतवंडे), भाऊ -बहीण, चुलते इ.  ह्यांचा समावेश होतो. आता तुमच्या केस मध्ये  भावाने मृत्यूपत्र न करताच तो मयत झाला, तर त्याचे वरील कुठलेच क्लास-१ वारस नसल्याने, त्याची बहीण हीच एकमेव मालक बनेल.  

*हिंदू महिला आणि मिळकतीचे विभाजन* :

हिंदू वारसा कायदा कलम १४ अन्वये   महिलांना एखादी मिळकत वारसाने, वाटपाने , पोटगीसाठी किंवा पोटगीच्या फरकापोटी,  मृत्यूपत्र किंवा बक्षीसपत्राने किंवा खरेदीने, स्त्रीधनापोटी इ. प्रकारे  आणि  कोणाकडूनही    मिळाल्यास ती महिला अश्या मिळकतींची संपुर्ण मालक होते.   ह्याला अपवाद म्हणजे ज्या  मिळकतींमध्ये फक्त तहहयात राहण्याचा हक्क दिला असेल त्या सोडून.   

*निपुत्रिक महिला आणि मिळकतीचे विभाजन*  : 

या साठी आपल्याला कलम  १५ अभ्यासावे लागेल. कलाम १५(१) प्रमाणे जर का एखादी हिंदू महिला  मृत्यूपत्र न करता मरण पावली तर तिची मिळकत  प्रमाणे सर्वात प्रथम तिचा नवरा, मुलगा-मुलगी, जर मुलगा -मुलगी आधीच मयत झाली असल्यास त्यांची मुले (नातवंडे) ह्यांच्यामध्ये समानरीत्या विभागली जाईल. ह्यांच्यापैकी कोणीच नसेल तर मग नवऱ्याचे वारसांकडे आणि ते नसतील तर आई-वडील, तेही नसतील तर वडिलांच्या वारसांकडे आणि शेवटी आईच्या वारसांकडे मिळकत जाईल. त्यामुळे तुमच्या केसमध्ये तुम्ही जर मृत्यूपत्र केले नसेल तर तुमचा भाऊ हा तुमच्या वडिलांचा एकमेव क्लास-१ वारस आहे असे गृहीत धरून त्याच्याकडेच तुमची मिळकत जाईल.  'महिलेच्या मृत्यूनंतर अशी मिळकत हि मिळकतीच्या उगमाकडेच जाईल'  हि कलम १५(२) मधील  पूर्व अट  लक्षात घ्यावीच  लागते. मात्र अशी अट पुरुषांबाबत आढळून येत नाही !  

त्यामुळे जर महिलेला एखादी  मिळकत तिच्या वडील किंवा आईकडून मिळाली असेल आणि ती महिला निपुत्रिक (issueless ) असेल म्हणजेच तिचे मुलगा-मुलगी किंवा जर मुलगा -मुलगी आधीच मयत झाली असल्यास त्यांची मुले (नातवंडे) ह्यांपैकी कोणी  वारस हयात नसतील तर अशी मिळकत हि कलम १५ (१) प्रमाणे न जाता  केवळ त्या महिलेच्या वडिलांच्या वारसांकडेच  जाईल,  तसेच जर का मिळकत नवऱ्याकडून किंवा सासऱ्यांकडून आली असेल आणि वरीलप्रमाणेच ति निपुत्रिक असेल , तर अशी मिळकत हि तिच्या मृत्यूनंतर फक्त तिच्या नवऱ्याच्या वारसांकडे जाईल, हि तरतूद जरी आपल्याला लागू नसली तरी इतरांसाठी महत्वाची आहे.

 तुमच्या प्रश्नामुळे मृत्यूपत्राचे महत्व देखील अप्रत्यक्षपणे अधोरेखित झाले आहे आणि त्यामुळे तुम्ही दोघांनी  मृत्यूपत्र करून ठेवावे. ते नोंदणीकृत असल्यास अधिकच उत्तम, म्हणजे पुढील त्रास वाचतील.  तसेच एखादी कायदेशीर तरतूद किंवा न्याय-निकाल  आपल्याला लागू होतो किंवा नाही हे ठरविण्यासाठी  प्रत्येक केसच्या फॅक्टस देखील तपासून बघाव्या लागतात .

अर्थात, शेवटी हे नमूद करावेसे वाटते कि वारसा हक्काच्या ह्या तरतुदी समान नागरी कायदा आल्यावर मात्र बदलू शकतात, कारण लग्न, घटस्फोट आणि वारसा हक्क एवढ्याच गोष्टींसाठी धर्मामावर आधारित कायदे लागू होतात, बाकी कायदे सर्वांना समानच आहेत*.


*ऍड. रोहित एरंडे.©*






Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©