पिठोरी अमावास्या - भारतीय मातृदिन... ऍड. रोहित एरंडे ©
पिठोरी अमावास्या - भारतीय मातृदिन...
ऍड. रोहित एरंडे ©
फ.मु. शिंदे त्यांच्या प्रसिध्द "आई" या कवितेचा शेवट करताना म्हणतात "आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही... "
प्रेमस्वरूप - वात्सल्यसिंधू असे संबोधल्या गेलेल्या आईची महती सांगण्यासाठी वेगळ्या शब्दांची गरजही नाही. जगभरात 'मे' महिन्याच्या दुसऱ्या रविवारी 'मदर्स डे' साजरा केला जातो
तसे बघितले तर प्रत्येक दिवस हा 'मदर्स डे'च असतो.. पण मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी असल्यामुळे प्रत्येक कारणासाठी "दिनविशेष" असतोच. त्याचप्रकारे जगभरात आईसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी मे महिन्याच्या दुसर्या रविवारी 'मदर्स डे' (Mothers Day) साजरा केला जातो. तो साजरा कराच.. परंतु आपल्यापैकी अनेकांना कदाचित माहिती नसेल कि भारतामध्ये कित्येक शतके श्रावण महिना संपायच्या दिवशी म्हणजेच श्रावण अमावस्येला ज्याला 'पिठोरी अमावस्या' म्हणतात, त्यादिवशी 'मातृदिन' म्हणजेच आत्ताच्या भाषेत 'मदर्स डे साजरा करण्याची पद्धत आहे.
पिठोरी अमावस्येदिवशी मातृदिन का साजरा केला जातो?
व्रत-वैकल्ये हा आपल्या संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे आणि त्यामागे काहीतरी विचार केल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे वर्षातील प्रत्येक अमावास्या -पौर्णिमेला काहीतरी दिनविशेष दिसून येईल. या मध्ये कालानुरूप त्यात बदल झाले असतील किंवा ते करावेत. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते करायची कि नाहीत याची काही सक्ती नाही. ज्याने त्याने हा निर्णय घ्यायचा आहे. मुख्य म्हणजे पिठोरी अमावास्या हा दिवस पिठोरी अमावस्येदिवशी ज्या स्त्रीची मुले अल्पायुषी ठरतात किंवा ज्या स्त्रीला अपत्यसुख लाभत नाही, अश्या स्त्रियांसाठी "पिठोरी अमावस्या व्रत" करावे असे म्हणतात आणि त्यामागची कथा देखील अशीच आहे.
या दिवशी ६४ योगिनींचे पूजन करण्याबरोबरच “पिठाचे दिवे" करुन पूजन करण्याच्या रुढीमूळे या दिवसाला "पिठोरी अमावस्या" हे नाव मिळालेले आहे ! या ६४ योगिनींची कथा सर्वश्रुत आहेच..
या अमावस्येला पितरांना स्नान, दान, पूजा आणि नैवेद्य याला देखील विशेष महत्त्व देण्यात आले आहे. नुसते माणसांप्रति नव्हे तर प्राण्यांप्रति देखील कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या आपल्या संस्कृतीमध्ये आजचा पिठोरी अमावास्या हा दिवस 'बैलपोळा' म्हणून देखील साजरा केला जातो. वर्षभर बैलाकडून काम करून घेणे तरी प्रत्येक शेतकरी हा बैलाची जीवापाड काळजी घेत असतोच. पण या विशेष या दिवशी शेतकऱ्यांचा सच्चा साथी - दोस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता बैलांची विशेष सजावट करून, नदीवर नेवून अंघोळ घालतात आणि त्यांच्या खांद्याना हळद आणि तूपाने शेक देण्याची पद्धत आहे. त्यानंतर पाठीवर नक्षीकाम करुन झूल, संपूर्ण अंगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण घातली जाते. पया दिवशी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात पुरणाचा स्वयंपाक असून बैलदेखील पुरणपोळी खायला देतात आणि संबंध दिवस बैलाकडून कोणतेही कष्टाचे काम करून घेत नाहीत.
असे हे आपले सण - समारंभ.. याची माहिती नवीन पिढीला करून देणे गरजेचे आहे.
धन्यवाद
ऍड. रोहित एरंडे ©
Comments
Post a Comment