"हल्ले डॉक्टरांवर, परिणाम समाजावर.... " ऍड. रोहित एरंडे.
हल्ले डॉक्टरांवर, परिणाम समाजावर....
***** ****** ***** ****** ****
ऍड. रोहित एरंडे.
एका गोष्टीत दुमत नसावे की इतर कुठल्याही प्रोफेशन पेक्षा डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप म्हणून ओळखले जाते आणि इथे भक्तांची गल्लत होते. डॉक्टर जर का देव असेल, तर त्याची विटंबना (हल्ला )करू नका....आणि...डॉक्टर जर का देव नसेल तर, त्याच्या मर्यादा ओळखा. हे लिहिण्याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये डॉक्टर, हॉस्पिटल ह्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.
कलकत्त्यामधील डॉक्टरांवर झालेले जीवघेणे हल्ल्यांचे फोटो बघून अस्वस्थ व्हायला होते. असा एकही दिवस जात नसावा की अश्या घटना घडल्या नाहीत. ह्या पूर्वी
स्वाईन फ्लू मुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णाला मृत घोषीत केल्यामुळे डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप हैदराबाद येथील ग्लोबल हॉस्पिटल मध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी प्रचंड गोंधळ करून तोडफोड करून डॉक्टरांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार मागील आठवड्यात घडला. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील एका रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने वैद्यकीय विश्वात खळबळ उडाली होती. भारतामधील फार थोडी हॉस्पिटल अशी असतील जिथे असे दुर्दैवी प्रकार घडले नसतील.
अश्या सतत होणाऱ्या प्रकारांमुळे एम बी बी एस मधील "एम बी" म्हणजे "मसल बाऊंड" होण्याची वेळ आता डॉक्टरांवर आली आहे, असे म्हणले तर गैर ठरू नये. जर आता हल्ल्यांचे गैर प्रकार वेळीच रोखले नाहीत , तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि ते समाजालाच भोगावे लागतील.
अश्या सतत होणाऱ्या प्रकारांमुळे एम बी बी एस मधील "एम बी" म्हणजे "मसल बाऊंड" होण्याची वेळ आता डॉक्टरांवर आली आहे, असे म्हणले तर गैर ठरू नये. जर आता हल्ल्यांचे गैर प्रकार वेळीच रोखले नाहीत , तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि ते समाजालाच भोगावे लागतील.
वैद्यकशास्त्र : एक अपूर्ण शास्त्र.
वैद्यकशास्त्रामध्ये रोज काही ना काही नवीन शोध लागत असतात. त्याची व्याप्ती प्रचंड आहे, त्यामुळेच वैद्यकशास्त्र हे सतत विकसित होत असलेले शास्त्र आहे. "दैव जाणिले कोणी" हे उपचारांबाबतीत नक्की लागू पडते. आपले मानवी शरीर हे एक अजब गुंतागुंतीचे यंत्र आहे आणि त्याची पूर्ण ओळख अजूनही झालेली नाही, हे अनेक डॉक्टर देखील मान्य करतात. 'व्यक्ती तितक्या प्रकृती’ असल्याने उपचारांचा परिणामही वेगवेगळा ठरतो. एखाद्या आजारावर उपचार करण्याच्या वेगवेगळ्या; पण मान्यताप्राप्त व वर्षानुवर्षे वापरलेल्या पद्धती असतात. प्रत्येक उपचार पद्धतीला त्याचे फायदे-तोटे असतात, त्यामुळे संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्या ज्ञानाचा व कौशल्याचा पुरेपूर उपयोग करूनदेखील जर दुर्दैवाने उपचारास यश आले नाही तर त्याचा दोष डॉक्टरांना देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालांमध्ये स्पष्ट केले आहे. कोणत्याही डॉक्टरला आपला पेशंट मरावा असे वाटत नाही. त्यामुळे ह्या "अपूर्णतेची"कल्पना आपल्या सगळ्यांना असणे आवश्यक आहे.
पेशंटचीही जबाबदारी :
एकीकडे बेफाम पणे गाडी चालवायची आणि जबर जखमी होऊन परिस्थिती हाताबाहेर गेली, किंवा डॉक्टरांनी दारू पिऊ नका असे सांगितले तरी खूप प्यायची आणि मग किडन्या - लिव्हर निकामी झाली कि त्या परत उत्तम व्हाव्यात म्हणून डॉक्टरांकडे जायचे किंवा रिपोर्ट मध्ये शुगर कमी दिसावी म्हणून फक्त 2 दिवस अजिबातच गोड खायचे नाही आणि मग शुगर कमी होत नाही म्हणून ओरडायचे, इंटरनेट वरून माहिती घेऊन स्वतःचे स्वतःच उपचार करायचे आणि ह्या सर्व प्रकारात गुण आला नाही, आजार बारा झाला नाही म्हणून दोष डॉक्टरांवर थापायचा आणि शेवटी डॉक्टरांनाच मारायचे, असे काहीसे प्रकार घडत असतात. आपण देखील 'प्रिव्हेंशन इज बेटर द्यान क्युअर" ह्या तत्वाचा वापर करणे उत्तम. एखाद्या रुग्णाने उपचारास प्रतिसाद दिला नाही किंवा दुसरीकडे उपचार नीट होऊ शकतील असा सल्ला दिला तर यात डॉक्टरांची चूक कशी असू शकेल, याचा विचार न करता एकदम जाऊन डॉक्टरांना बेदम मारायचे, हॉस्पिटलची मोडतोड करायची, यातून काहीच साध्य होत नाही. उलट डॉक्टरांना रुग्णाबद्दल वाटणारी आपुलकी कमी होते. हे रुग्णांसाठी जास्त धोकादायक आहे. आता कित्येक डॉक्टर मंडळी त्यांच्या मुलांना ह्या व्यवसायात येण्यापासून रोखत आहेत आणि हे खचितच चांगले लक्षण नाही.
निष्काळजीपणा आणि कायदा :
याचा अर्थ डॉक्टरविरुद्ध काहीच कारवाई करता येत नाही असे नाही. अप-प्रवृत्ती ह्याही व्यवसायात आहेतच की. न्यायालयीन केसच्या भीतीमुळे आता डॉक्टर कुठलीही रिस्क घेत नाहीत आणि शक्य त्या सर्व टेस्ट करण्यास सांगतात. वैद्यकीय निष्काळजीपणाच्या खटल्यांत आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने संयत निर्णय दिलेले आहेत. योग्य तेथे कोट्यवधी रुपयांची नुकसानभरपाईही रुग्णाला दिलेली आहे; तर त्याचबरोबर फौजदारी कारवाईचे निकषदेखील घालून दिलेले आहेत. उजव्या हाता ऐवजी डाव्याच हाताचे ऑपेरेशन केले, एखाद्या शाखेचे ज्ञान नसतानादेखील त्या शाखेसंदर्भात उपचार केले, ऑपरेशन नंतर पोटात कापसाचा गोळा विसरणे अशा प्रकरणांत डॉक्टरांना न्यायालयाने जबर दंड अथवा शिक्षा केलेल्या आहेत. एकीकडे होणारे हल्ले आणि दुसरीकडे कोर्ट केसेसची भीती असे इतर कुठल्याही प्रोफेशनलच्या बाबतीत आढळून येत नाही. ऱ्या कोर्ट केसेस चे प्रमाण जास्त दिसून येईल त्यामुळे कुठल्याही कारणास्तव अश्या हल्ल्यांचे समर्थन करता येणार नाही.
डॉक्टरंना हल्ल्यापासून कायद्याचे कवच, पण कागदावरच ?
इंडियन पिनल कोड मधील नेहमीच्याच तरतुदींबरोबरच महाराष्ट्रा सारख्या अगदी मोजक्या काही राज्यांनी डॉक्टरांवरील होणाऱ्या हल्ल्यांपासून रक्षण करण्यासाठी विशेष कायदे पारित केले आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाने देखील निष्काळजीपणापोटी डॉक्टरांवर दाखल होणाऱ्या खोट्या गुन्ह्यांबद्दलही असे म्हटले आहे, की जर प्रत्येकवेळी असे गुन्हे दाखल व्हायला लागले तर डॉक्टरांना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजाकरिता करणे अवघड होऊन बसेल व अशाने समाजाचेच प्रचंड नुकसान होईल. हे विधान डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबतदेखील तंतोतंत लागू पडेल.
महाराष्ट्र वैद्यकीय व्यक्ती आणि संस्था, हिंसा आणि मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा २०१० साली पारित झाला आहे. ह्या कायद्यान्वये डॉक्टर, मेडिकलचे विदयार्थी, हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ , मदतनीस ह्या सर्वांना हल्ल्यांपासून रक्षण दिले आहे. रु. ५०,०००/- दंड आणि/अथवा ३ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ह्या कायद्यान्वये आरोपींना होऊ शकते, त्याच प्रमाणे हॉस्पिटल मालमत्तेचे, मशिनरी ह्यांचे नुकसान झाल्यास त्यांच्या किंमतीच्या दुप्पट किंमती एवढी नुकसान भरपाई देखील आरोपींकडून वसूल करता येईल. ह्या कायद्याखाली कदाचित पहिलीच शिक्षा मागील आठवड्यात पालघर येथील कोर्टाने दिल्याचे वाचनात आले. ह्या कायद्याची नीट अंमलबजावणी झाल्यास अश्या गैर प्रकारांना आळा बसू शकेल.
डॉक्टरांचे एकमेव असे प्रोफेशन असावे कि त्यांना एकाच वेळी पेशंटचा रोष आणि कायदेशीर कारवाईची भीती, असे दोघांनाही सामोरे जावे लागते. ह्याचे कारण म्हणजे जर का डॉक्टरांवर हल्ला झाला तर त्यांची स्वाभाविक प्रतिक्रिया हि संपावर जाण्याची असते. परंतु "संप करणे" हा कायदेशीर अधिकार नसल्याचे वेळोवेळी मा. सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयांनी सांगितल्यामुळे तो ही मार्ग बंद होतो. ह्या मुळे आता हॉस्पटिल मध्ये बाऊन्सर्स ठेवणे सुरु झाले आहे. सध्या डॉक्टर-पेशंट ह्यांचे नातेसंबंध हे दुष्टचक्रात अडकले आहे.
असे हल्ले रोखण्यासाठी इतर उपाय काय असू शकतात ?
सर्व समावेशक केंद्रीय कायदा करणे खूप गरजेचे आहे. डॉक्टर-पेशंट ह्यांचे दुष्ट चक्रात अडकलेले नाते संबंध सुधारणे गरजेचे आहात. ह्यासाठी "संवाद" वाढणे गरजेचे आहे. पेशंट आणि त्याच्या नातेवाईकांना डॉक्टरांचे २ सहानुभूतीचे शब्द हवे असतात. ह्याकडे डॉक्टरांनी देखील लक्ष द्यावे. पेशंटला भेटायला येणारे 'व्हिजिटर्स' च्या संख्येवर नियंत्रण हा एक महत्वाचा उपाय आहे. मा. मुंबई उच्च न्यायालायने देखील २०१७ मध्ये मार्ड डॉक्टरांच्या याचिकेवर निर्णय देताना पेशंटला भेटायला येणाऱ्या "व्हिजिटर्स" ची संख्या एकावेळी २ एव्हडीच ठेवावी असा निकाल दिला आहे.
शेवटी आपण लक्षात घ्यावे की डॉक्टर म्हणजे काही देव नाही. त्यांच्याही उपचारांना मर्यादा आहेतच आणि निष्काळजीपणा केल्यास त्यांच्यावर कायद्याचा बडगा देखील उगारता येतो. कायदा हातात घेऊन डॉक्टरांवर काय किंवा कोणावरही हल्ला करणे हे प्रगत समाजाचे खचीतच लक्षण नाही. कमीत कमी कायदे आणि कमीत कमी हॉस्पिटल्स हे प्रगत समाजाचे लक्षण आहे.
ऍड . रोहित एरंडे.
पुणे. ©
पुणे. ©
Absolutely agree with you sir ...
ReplyDeleteएकदम मनातलं लिहिले आहे.
खरंच या सगळ्या प्रकाराची किमंत येणार्या पिढ्या मोजतील. .
धन्यवाद.. आपले नाव समजू शकेल काय ?👍
Delete