हिंदू पुरुषाचे वारस कोण ? मृत्युपत्र केले नसेल तर वारसा हक्क कायदा लागू होईल.. ऍड. रोहित एरंडे.©
हिंदू पुरुषाचे वारस कोण ? मृत्युपत्र केले नसेल तर वारसा हक्क कायदा लागू होईल..
ऍड. रोहित एरंडे.©
माझ्या पतीने त्यांच्या स्वकमाईतून एक फ्लॅट विकत घेतला होता त्या फ्लॅटमध्येच मी राहते. मागील वर्षी माझ्या पतीचे निधन झाले मात्र त्यांनी कोणतेही विल करून ठेवलेले नव्हते. आम्हाला मूल -बाळ नाही. आता हिंदू वारसा कायद्याप्रमाणे मी एकटीच माझ्या पतीची कायदेशीर वारस असल्याने तो फ्लॅट माझ्या एकटीच्या मालकीचा झालेला असतानाही आता अचानक आमच्याशी कुठलेही संबंध न ठेवलेले माझे दीर म्हणत आहेत कि त्यांच्या आईचा म्हणजेच माझ्या सासूबाईंचा देखील त्या फ्लॅटमध्ये हिस्सा आहे. तर माझ्या सासूबाईंना हिस्सा मिळेल का ?
एक वाचक, पुणे.
तुमच्यासारखे प्रश्न अनेकांना पडत असतील. आपल्या मृत्युनंतर आपले कायदेशीर वारस कोण होतात याची अनेकांना माहिती नसते आणि त्यामुळे असे प्रश्न निर्माण होतात.
एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा व्यक्तींच्या हयातीमध्ये खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच तबदील केला जाऊ शकतो. तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने (टेस्टमेंटरी सक्सेशन) किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने (इंटेस्टेट सक्सेशन ) तबदील होऊ शकतो. खरेदीखत, बक्षीसपत्र , मृत्युपत्र ह्यायोगे मिळालेली मिळकत हि त्या व्यक्तीची स्वष्टार्जित / स्वतंत्र मिळकत धरली जाते.
मात्र एखादा हिंदू पुरुष आणि महिला मृत्यूपत्र न करता मरण पावले तर त्यांच्या स्वकष्टार्जित संपत्तीची विभागणी वेगवेगळ्या तरतुदींप्रमाणे होते. ह्यासाठी ढोबळ मानाने वारसांची क्लास-१ -हेअर्स (वारस) आणि क्लास-२-हेअर्स (वारस) अशी विभागणी केलेली आढळते. .
*हिंदू पुरुष आणि मिळकतीचे विभाजन* :
एखादा हिंदू पुरुष मृत्यूपत्र न करता मरण पावल्यास त्याची स्वकष्टार्जित मिळकत हि हिंदू वारसा कायद्याच्या कलम ८ अन्वये सर्व प्रथम क्लास-१ हेअर्स ज्यांच्यामध्ये प्रामुख्याने त्याची विधवा पत्नी, मुलगा -मुलगी (मुले) ,आई , मुलगा -मुलगी आधीच मयत झाली असल्यास त्यांची मुले (नातवंडे), मुलाची विधवा पत्नी (सून) इ. चा समावेश होतो, ह्या वारसांना समान पद्धतीने मिळेल आणि जर का क्लास-१ वारसांपैकी कोणीही नसेल, तर मग क्लास-२ वारसांकडे अशी संपत्ती जाते. क्लास-२ हेअर्स मध्ये प्रामुख्याने वडील, मुलाच्या किंवा मुलीच्या मुलीचा मुलगा किंवा मुलगी (पतवंडे), भाऊ -बहीण, चुलते इ. यांचा समावेश होतो. तुमच्या केसमध्ये तुम्हाला मूलबाळ नाही. त्यामुळे वर नमूद केल्याप्रमाणे क्लास-१ हेअर्स मध्ये तुमच्याबरोबरच सासूबाईंचा देखील सामान अविभक्त हिस्सा निर्माण झाला आहे.
तुमच्या पतीने जर का त्याच्या हयातीमध्ये मृत्युपत्र (विल ) करू ठेवले असते तर त्या मृत्युपत्राने कदाचित तुम्हाला त्यांनी मिळकत दिली असती असे समजू. पण आता मृत्युपत्र केले नसल्याने हिंदू वारसा कायदा लागू होऊन तुमच्या बरोबरच तुमचे सासूबाईंचा म्हणजेच तुमच्या पतीचे आईचा देखील क्लास -१ वारस म्हणून सदरील फ्लॅटमध्ये सामान अविभक्त हिस्सा निर्माण झाला आहे. त्यामुळे तुमच्या दीरांचे म्हणणे कायद्याला धरून आहे आणि सासूबाईंच्या मृत्युनंतर त्यांचा हिस्सा आपल्याला मिळेल हि दीराची हि अटकळ असू शकेल. . भावनिक दृष्ट्या किंवा नैतिकतेने तुम्हीच एकट्या मालक आहत असे तुम्हाला वाटणे संयुक्तिक आहे. परंतु कोर्टामध्ये भावनांना थारा नाही आणि पैसा -संपत्ती अली कि नातेसंबंध दुरावतात हे कोर्टातील कटू सत्य आहे. जर का परस्पर संमतीने तडजोड झाली तर उत्तम. मात्र तुमच्याकडे फ्लॅटचा ताबा असल्याने काळजीचे कारण नाही. कारण ताब्याला १० पैकी ९ मार्क असे कायद्यात म्हणतात. त्यामुळे जर तुमच्या फ्लॅटचा ताबा हवा असेल तर तुमच्या सासूबाईंना तुमचे विरुध्द वाटपाचा दावा लावावा लागेल आणि त्याला जो वेळ लागेल तो लागेल. असो.
तुमच्या प्रश्नामुळे केसमुळे मृत्यूपत्राचे महत्व देखील अप्रत्यक्षपणे अधोरेखित झाले आहे. मृत्यूपत्र केले असेल तर वारसा कायद्याला बगल देता येते. Will is made to give go-bye to the normal line of succession असे कायदेशीर वचन आहे. त्यामुळे तुम्ही कमीतकमी आता तुमच्या हिश्शयापुरते तरी मृत्युपत्र करून ठेवा. शेवटी अन्यथा हिंदू वारसा कायदा कलम १५ प्रमाणे ही मिळकत नवऱ्याकडून किंवा आली असल्याने आणि तुम्हाला मूल बाळ नसल्याने अशी मिळकत तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या नवऱ्याच्या वारसांकडे, पर्यायाने सासूबाई किंवा दीर यांचेकडे जाईल.
ऍड. रोहित एरंडे.©
Comments
Post a Comment