सोसायटीमधील रेफ्युज एरिया म्हणजे काय ? ऍड. रोहित एरंडे Ⓒ

सोसायटीमधील रेफ्युज एरिया म्हणजे काय ?

ऍड. रोहित एरंडे Ⓒ

बांधकाम क्षेत्रामध्ये कालानुरूप अनेक बदल झाले. सुमारे  ८०-९० च्या दशकात आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल कि ४-५ माजली बिल्डिंग म्हणजे खूप मोठी बिल्डिंग वाटायची. मात्र जस  जशी लोकसंख्या वाढू लागली आणि जागांची मागणी वाढू लागली तशी इमारतींची उंची देखील वाढू लागली. आणि आता तर १० पासून ५० मजल्यापर्यंत बिल्डिंग आपल्याकडे सहजरित्या बांधल्या जाऊ लागल्या आहेत. मात्र जेवढ्या उंच  बिल्डिंग तेवढे त्यांचे बाकीचे प्रॉब्लेम्स देखील तसेच मोठे. एवढ्या मोठ्या उंच बिल्डिंगमध्ये जर दुर्दैवाने आग लागल्यासारखे आपत्कालीन  प्रसंग निर्माण झाले तर सर्व रहिवाश्यांना सुखरूप बाहेर पडण्यासाठी एखाद्या सुरक्षित ठिकाणाची  गरज असते. ह्या दृष्टीने भारतामध्ये सुमारे २००५ मध्ये प्रकाशित झालेल्या  नॅशनल बिल्डिंग कोड मध्ये ' रेफ्युज एरिया' हि संकल्पना मंडळी गेल्याचे दिसून येते. ह्या बांधकामाबद्दल सर्व काही असे स्वरूप असलेल्या ह्या कोड मध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर पडण्यासाठी जे मार्ग आहेत ते कायमच मोकळे आणि अतिक्रमण मुक्त ठेवले पाहिजेत हे तत्व दिसून येते. 

सोप्या शब्दात सांगायचे झाले तर रेफ्युज एरिया म्हणजे अश्या उंच इमारतींमध्ये ठराविक मजल्यानंतर   पूर्णपणे मोकळी ठेवलेली जागा, ज्याचा  उपयोग आग लागण्यासारख्या  आपत्तीच्या काळात रहिवाश्यांच्या सुटकेसाठी  केला जाऊ शकतो. 

महाराष्ट्रामध्ये ह्या पूर्वी वेगवेगळी असलेली  परंतु   २०२० मध्ये जी एकत्रित  बांधकाम नियमावली म्हणजेच  यूनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रुल्स प्रसिद्ध झाले त्यामध्ये देखील रेफ्युज एरिया बद्दल स्पष्ट तरतुदी आहेत. ज्या इमारतींची उंची २४ मीटर  ते ३९ मीटर  आहे अश्या ठिकाणी २४ मीटर नंतरच्या लगेचच असलेल्या मजल्यावर रेफ्युज एरिया ठेवणे क्रमप्राप्त आहे. जर का इमारतीची उंची ३९ मीटर पेक्षा जास्त असेल, तर ३९ मीटर नंतरच्या मजल्यावर लगेचच आणि त्यानंतर प्रत्येक १५ मीटर नंतरच्या  मजल्यावर रेफ्युज एरिया ठेवणे क्रमप्राप्त आहे. ह्याची कमीतकमी  एक बाजू "ओपन टू  एअर" असावी आणि गरजेपुरता (रेलिंग) कठडा असावा.  ह्या एरियाचे दार सुद्धा किती  तास आगीपासून सरंक्षण देऊ शकेल, ह्याचे देखील  नियम आहेत. तसेच  ह्या  एरियाचे क्षेत्रफळ  किती असावे  हे देखील बांधकाम नियमावली मध्ये नमूद केले आहे कारण जरुरीपेक्षा जास्त रेफ्युज एरिया सोडल्यास तो  एफएसआय मध्ये धरला जातो.  त्याचप्रमाणे असा एरिया बिल्डरला विकत येत नाही हेही लक्षात घ्यावे. 

सोसायटीपुरता विचार केल्यास अश्या बहुमजली इमारतींमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने  रेफ्युज एरिया असणे हे रहिवाश्यांच्या दृष्टीने गरजेचे आहे. मात्र असे    रेफ्युज एरिया हे   काही सोसायट्यांमध्ये आहे तसे तर काही ठिकाणी   चोहोबाजुंनी  पूर्णपणे  बंदिस्त करून त्याचा उपयोग हॉल सारखा केल्याचे आढळून येते. आता इथे दोन बाबी आहेत. नियमावर बोट आणि प्रॅक्टिकल बाजू.  रेफ्युज एरियाचा वापर अन्य कोणत्याही कारणाकरिता करणे हे नियमाविरुद्व होईल ह्याची नोंद घ्यावी. परंतु प्रॅक्टिकली हा  एरिया स्वच्छ ठेण्याची जबाबदारी सोसायटीवरच येते आणि  एखाद्या जागेचा वापर झाला नाही, तर ती जागा खराब होऊ शकते. ह्याचा सुवर्णमध्य काढण्याची जबाबदारी सोसायटीवर येते.

धन्यवाद .. 🙏

ऍड. रोहित एरंडे Ⓒ

पुणे 

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©