मृत्यूपत्र (WILL) : समज कमी गैरसमज जास्त.
मृत्यूपत्र (WILL) : समज कमी गैरसमज जास्त.
मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र किंवा इंग्रजी मध्ये ज्याला Will म्हणतात, त्याबद्दल आपल्याकडे समज कमी आणि गैरसमज जास्त दिसून येतात. इतकेच काय तर त्याबद्दल विषय काढणे म्हणजे जणू काही मृत्यूलाच निमंत्रण दिले आहे असे समजले जाते. ह्यात अतिशोयोक्ती नाही.
खरे तर मृत्यूपत्र हा एक अतिशय महत्वाचा आणि तुलनेने करावयास सोपा असा दस्तऐवज आहे. जेणेकरून आपल्या मृत्यूपश्चात आपल्या मिळकतींची व्यवस्था लावता येते. अश्या मृत्यूपत्राबद्दलची आपण थोडक्यात माहिती करून घेऊ
मृत्यूपत्र कोण करू शकते ?
मृत्यूपत्राबद्दलच्या तरतुदी ह्या भारतीय वारसा कायदा १९२५ मध्ये समाविष्ट केल्या आहेत. कोणतीही सज्ञान आणि जिचे मानसिक संतुलन ढळलेले नाही अशी कोणतीही व्यक्ती तिच्या स्व-कष्टार्जित (self -acquired ), स्थावर (immovable ) आणि जंगम (movable ) मिळकतींसंदर्भात मृत्यूपत्र करू शकते. त्याचबरोबर हिंदू वारसा कायदा कलम ३० प्रमाणे वडिलोपार्जित मिळकतीमधील स्वतः चा अविभक्त हिस्सादेखील मृत्यूपत्राने देता येतो. मृत्यूपत्र हे लेखीच असावे लागते. अर्थात त्याचा कुठलाही साचा किंवा नमुना कायद्याने दिलेला नाही. फक्त मुस्लिम धर्मीय व्यक्ती तोंडी मृत्यूपत्र करू शकतात.
मृत्यूपत्र कसे असावे ?
मृत्यूपत्र करण्याआधी थोडी तयारी करावी लागते. म्हणजे आपल्या सर्व मिळकतींची यादी करावी लागते आणि हे काम थोडे वेळखाऊ असते, हे तुमच्या लक्षात येईल. साध्या कागदावर देखील मृत्यूपत्र लिहिता येते. मृत्यूपत्राची भाषा हि सोपी आणि सुटसुटीत असावी. मिळकतीचे वर्णन स्पष्ट असावे आणि कुठल्या लाभार्थीना कुठली मिळकत मिळणार हे देखील स्पष्ट लिहावे. उदा . २ सोन्याचे हार जर दोन मुलींना द्यायचे असतील तर त्या दोन्ही हारांच्या वजनासह त्यांचे वर्णन करावे , जेणेकरून १ पदरी कोणी घायचा आणि २ पदरी कोणी घायचा ह्यावरून वाद व्हायला नको. त्याच प्रमाणे बँका, शेअर्स, इन्शुरन्स, बँक-लौकर ह्यांचे नंबरसहित वर्णन करावे.
दोन साक्षीदार असणे अनिवार्य :
मृत्यूपत्र कायदेशीर ठरण्यासाठी मृत्यूपत्रावर दोन सज्ञान साक्षीदारांनी सही करणे कायद्याने गरजेचे आहे. मृत्यूपत्र करणाऱ्याने आणि दोन साक्षीदारांनी एकमेकांसमोर मृत्यूपत्रावर सही करणे गरजेचे आहे. अर्थात २ साक्षीदारांनी एकाचवेळी सही केली पाहिजे असे काही नाही. त्याच प्रमाणे साक्षीदारांना मृत्युपत्रात काय लिहिले आहे, हे माहिती असणे अपेक्षित नाही. मृत्यूपत्रातील लाभार्थींना मात्र साक्षीदार होता येत नाही.
डॉक्टर सर्टिफिकेट :
मृत्यूपत्राच्या शेवटी मृत्यूपत्र करणाऱ्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम होती अश्या आशयाचे डॉक्टर चे सर्टिफिकेट आपण बघितले असेल. मात्र असे सर्टिफिकेट असणे कायद्याने सक्तीचे नाही आणि केवळ ते नाही म्हणून मृत्यूपत्र बेकायदेशीर ठरत नाही. पण प्रॅक्टिकली असे सर्टिफिकेट असणे चांगले.
स्टँम्प , नोंदणी (Registration ). :
मृत्यूपत्रास कोणताही स्टॅम्प लागत नाही. त्यामुळे खरेदी खत, बक्षीस पत्र इ. दस्तांच्या तुलनेत मृत्यूपत्र तुलनेने खूपच कमी खर्चाचा दस्त आहे.
तसेच मृत्युपत्राची नोंदणी करणेही कायद्याने बंधनकारक नाही. मात्र नोंदणी कायदा, १९०८ मध्ये मृत्यूपत्राबद्दल काही विशेष तरतुदी आहेत. उदा. इतर कुठलेही दस्त हे अंमलात (execute )आणल्यानंतर ४ महिन्यानंतर नोंदवावे लागतात मात्र मृत्यपत्र हे, ते केल्यानंतर कधीही नोंदवता येते. त्याचप्रमाणे मृत्यूपत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर देखील ते नोंदवता येते. त्याच प्रमाणे एखाद्या व्यक्तीला त्याचे मृत्यूपत्र हे नोंदणी अधिकाराच्या ताब्यात सिलबंद लखोट्यामध्ये देखील कस्टडी सारखे ठेवता येते आणि संबंधित व्यक्तीला किंवा त्याच्या तर्फे माहितगार इसमास असे मृत्यूपत्र अर्ज करून मागे घेता येते.
शेवटचे मृत्युपत्रच ग्राह्य धरले जाते :
मृत्यूपत्र हे कितीही वेळा बदलता येते आणि सर्वात शेवटचेच मृत्यूपत्र ग्राह्य धरले जाते. बदलेल्या परिस्थितीमुळे मृत्यूपत्रामध्ये योग्य ते बदल करणे गरजेचे असते. मृत्यूपत्र ना बदलता पुरवणी-मृत्यूपत्र (codicil ) देखील करता येते आणि त्यास मृत्यूपत्राच्याच सर्व कायदेशीर तरतुदी लागू होतात.
मृत्यूपत्र कधी करावे ?
बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे कि खूप म्हातारे झाल्याशिवाय मृत्यूपत्र करायचीच गरज नाही; किंवा मृत्यूपत्र केले म्हणजे आपला मृत्यूचं जवळ आला असे अनेकांना वाटते. एकतर मृत्यू निश्चित असला तरी त्याची वेळ सर्वात अनिश्चित असते. सबब आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम असतानाच मृत्यूपत्र करणे इष्ट आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात तर ते लवकरात लवकर करावे. कुठल्या दिवशी मृत्यूपत्र करावे असाही प्रश्न लोकांना पडतो आणि त्या बद्दल काही कायद्यात तरतूद नाही. शक्यतो असा दिवस उदा जन्मदिवस, लग्नाचा वाढदिवस अश्या विशेष दिवशी मृत्यूपत्र करणे लक्षत राहू शकते.
मृत्युपत्राची अंमलबजावणी :
मृत्यूपत्राच्या अंमलबजावणी करता एक किंवा अधिक व्यवस्थापक म्हणजेच executors नेमता येतात. मात्र असे करणे कायद्याने बंधनकारक नाही. व्यवस्थापक म्हणजेच executors नसल्यास कोर्टामधून "लेटर्स ऑफ ऍडमिन्सट्रेशन " मिळवता येते.
प्रोबेट (Probate )
आपल्यापैकी अनेकांनी प्रोबेट हा शब्द ऐकला असेल.कोर्टाने प्रोबेट सर्टिफिकेट देणे म्हणजे संबंधित मृत्यूपत्र हे अस्सल आहे आणि कायदेशीरपणे अंमलात आणलेले आहे अशी पुष्टी देणे आणि एकदा का प्रोबेट मिळाले की ते सर्वांवर बंधनकारक असते. मात्र मृत्युपत्राचे प्रोबेट घेणे हे फक्त मुंबई, चेन्नई आणि कोलकोता ह्या मेट्रोपॉलिटिन शहरांमध्येच गरजेचे आहे. इतर ठिकाणी अजिबात नाही. ह्या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाचे अनेक निकाल आहेत. उदा. पुण्यात मृत्यूपत्र केले असल्यास आणि मिळकत देखील पुण्यात असल्यास प्रोबेट ची गरज नाही असे मुंबई उच्च न्यायालायने श्री. भगवानजी राठोड विरुद्ध सुरजमल मेहता (AIR २००३ बॉम . ३८७) ह्या निकालात नमूद केले आहे. सबब ज्या ठिकाणी प्रोबेट कायद्यानेच लागत नाही तिथे त्याची सक्ती करणे उदा. बँक , चुकीचे आहे. ह्या साठी बँक अधिकारी संबंधित लोकांकडून फार तर indemnity bond लिहून घेऊ शकतात. जेणेकरून पूढे काही वाद उदभवल्यास बँकांची काही जबाबदारी राहणार नाही.
मृत्यूपत्र नॉमिनीवर बंधनकारक :
नॉमिनी हा केवळ एक विश्वस्त असतो. सोसायटी, शेअर्स, विमा अश्या ठिकाणी नॉमिनेशन करावे लागते. मात्र नॉमनी व्यक्तीस काही मालकी हक्क मिळत नाही. ती एक तात्पुरती सोय असते. जेणेकरून मृत व्यक्तीच्या मिळकतीसंदर्भात पत्रव्यवहार इ. करता यावा. नॉमिनेशन हा काही वारसा हक्काचा तिसरा कायदा होऊ शकत नाही असे मुंबई उच्च न्यायालायने अनेक निकालांमधून स्पष्ट केले आहे. (पहा : शशिकिरण पारेख विरुद्ध राजेश अग्रवाल २०१२ (४) एमएच. एल. जे. ३७०) सबब एखादी मिळकत मृत्यूपत्राने "अ" ला दिली असेल आणि नॉमिनी म्हणून "ब" चे नाव असले तरी ती मिळकत "अ" लाच मिळेल.
मृत्यूपत्राचा अंमल :
मृत्यूपत्र करणारा बोलायचा थांबला कि,मृत्यूपत्र बोलायला लागते असे म्हणतात. थोडक्यात मृत्युपत्राची अंमलबजावणी ही मृत्यूपत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतरच होते. आपल्या हयातीत मिळकत तबदील करण्यासाठी खरेदी खत, हक्क सोड पत्र , बक्षीस पत्र के पर्याय असतातच. वारसा हक्काने ज्या मिळकती अन्यथा मिळू शकतात त्या हक्काला बगल देणे हे मृत्युपत्राची उद्दिष्ट असते. सबब मृत्यूपत्र करणाऱ्याच्या इच्छेला सगळ्यांनी मान द्यावा.
एखाद्या व्यक्तीस मृत्यूपत्राने काही न मिळाल्यास त्याचा राग न मानता यास मृत्यूपत्र करणाऱ्याची इच्छा समजून वस्थुस्थिती मान्य करावी. अर्थात याला अपवाद म्हणजे जर का मृत्यूपत्र संशयास्पद परिस्थितीमध्ये केल्याचे पुरावे असल्यास त्यास कोर्टात आव्हान देता येईल.
"मृत्यूस न ये चुकवितां | कांहीं केल्या " असे समर्थ रामदास स्वामींनी मृत्यचे वर्णन केले आहे. मात्र मृत्यू निश्चित असला तरी त्याची वेळ ही सर्वात अनिश्चित असते. त्यामुळे आपल्या मृत्यूनंतर आपल्या स्वकष्टार्जित मिळकतींसंदर्भात आपल्या जोडीरामध्ये, मुलं-मुलींमध्ये वाद होऊ नयेत म्हणून आपल्या हयातीतीच मृत्यूपत्र करणे श्रेयस्कर असते. मात्र यासाठी इंटरनेटवरील अर्धवट माहितीच्या हळकुंडाने पिवळे होण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांच्या मृत्युपत्राची नक्कल करण्यापेक्षा ह्या कामी जाणकार वकीलांचा सल्ला घेणे हे पुढील वाद टाळण्यासाठी नक्कीच गरजेचे आहे हे लक्षात घ्यावे.
Adv . रोहित एरंडे
पुणे ©
Sir. In one case will deed was registered.by A.in year 1981. But also In life time A. Divided his property, through Thashildar By way of partation in year 1990. And A died in year 1993. Effect of paration was recorded on all satbara .is will helpful?
ReplyDeleteएखादी व्यक्ती मिळकतीत काही हिस्सा (रूम)आपल्या सुनेच्या नावे बक्षिसंपत्र करून देऊ शकतो का,व त्या व्यक्ती ची पत्नी,व इतर मुले असताना ते बक्षिसंपत्र करताना पत्नी व मुले यांचे नाहरकत (NOC) गरजेची असते का की त्यांना न विचारता NOC न घेता विशेष करून पत्नी ची NOC न घेता असे बक्षीस पत्र सुनेच्या नावे करता येते का
ReplyDeleteकरता येईल पण त्यांच्या वारसांनी न्यायालयात आव्हान दिले तर ते रद्द होईल
Deleteलाभार्थी ला executor म्हणून नेमता येते का ?
ReplyDeleteहो
DeleteSir please send mobile number
ReplyDeleteबक्षीस पत्र करुन देनार यांचे स्वकष्टार्जित मालमत्ता असने आवश्यक आहे काय?
ReplyDeleteनाही
Deleteमाझी आईचे मृत्यू पत्र तयार केले आहे.ते नौंदणी केली आहे. परंतू एक साक्षीदार नौदणी औफीस न पोहोचल्या मुळे माझ्या पत्नीने सही केली तर चालेल का.
ReplyDeleteचालेल पण तुमची पत्नी ला त्या मृत्युपत्रात कोणताही हिस्सा नसावा
Deleteतसे आपणास पुराव्यानिशी सिद्ध करावे लागेल
ReplyDeleteसन् २०१३ साली आमच्या शेताची विक्री झाली म्हणून् आम्ही कोर्टाकडून stay ऑर्डर घेतली ki कोर्टाचे अंतिम निकाल होईपर्यंत विक्री अथवा तबादिली करू नये म्हणून् पन् सन् 2014 साली त्या शेताची आमच्या चुलत आजीने माझ्या आत्याच्या नावे जमिनीचे मृ त्यूपत्र केले तर् te रद्द hoel काय
ReplyDeleteसर म्रूत्यूपत्रच्या आधारे एका शेजाऱ्यांने आमच्या शेतात तुकडे बंदी चा दावा करून मिड्वलि आहे त्या वर काही उपाय तुमचा no.असल्यास Please send करा
ReplyDeleteआमच्या आजीनी माझ्या चुलत्यांच्या नावाने मृत्युपत्र करून ठेवले होते परंतु माझे चुलते आजीच्या अगोदर वारले तरी मृत्यपत्राची अंमलबजावणी होईल का?
ReplyDeleteसर माझे नावे माझ्या आजीने मृत्यू पत्र केले काहे पण त्यांच्या पच्यात त्यांच्या सुने ने ती मयत आहे व त्यांना मी वारस आहे असे नोंद केली आहे व आजीची 7/12सादरी नोंद पण नाही मग काशी मृत्यू पत्राची नोंद करावी
ReplyDeleteयाबद्दल माहिती मिळावी