मृत्युपत्राबद्दल थोडक्यात, पण महत्वाचे . ऍड. रोहित एरंडे


मृत्युपत्राबद्दल थोडक्यात, पण महत्वाचे 
ऍड. रोहित एरंडे ©

 मृत्यु निश्चित असतो, परंतु त्याची वेळ सर्वात अनिश्चित असते. अश्या अनिश्चिततेचा अनुभव आपण सर्व जण कोरोनाच्या  काळात घेत आहोत. त्यातच  लॉक-डाऊनचा  लोकांच्या आर्थिकस्थिती प्रमाणेच  मानसिक स्वास्थ्यावर देखील परिणाम होत आहे. कारण पुढे अजून काय परिस्थिती येणार आहे हे कोणी सांगू शकत नाही आणि त्यामुळे "आमचे मृत्युपत्र करता येईल का  " अशी विचारणा लोकांकडून व्हायला सुरुवात झाली आहे. ह्या महत्वाच्या विषयावर कितीही वेळा लिहिले तरी ते कमीच आहे असे जाणवते.  सबब ह्या महत्वाच्या विषयाबद्दल आपण  थोडक्यात माहिती घेवू.

१. भारतीय वारसा कायद्याप्रमाणे कोणत्याही सज्ञान आणि ज्याची मानसिक स्थिती सुदृढ आहे अश्या व्यक्तीस स्वतः च्या स्वकष्टार्जित मिळकती संदर्भात मृत्युपत्र / इच्छापत्रं म्हणजेच WILL करता येते. तर वडिलोपार्जित मालमत्ते मधील आपला अविभक्त हिस्सा देखील मृत्युपत्र द्वारे देता येतो. अजूनतरी इच्छामरणा -संदर्भातील इच्छापत्र करण्यासाठी स्वतंत्र कायदा नाही. देहदान, नेत्रदान करण्याची इच्छा असल्यास  हॉस्पिटल मध्ये  वेगळे फॉर्म्स उपलब्ध असतात त्याचा उपयोग करावा, तसेच मृत्यूपश्चात अंत्यसंस्कार करायचे कि  नाही हे मृत्युपत्रात लिहून उपयोगाचे नाही कारण माणसू गेल्यावर मृत्यूपत्र शोधण्याची ती वेळ नसते. त्यामुळे  ह्या गोष्टींची पूर्व कल्पना आपल्या हयातीतच प्रत्येकाने जवळच्यांना द्यावी.    

२. मृत्युपत्र करण्याआधी आपल्या सर्व स्थावर (घर, जमीन इ.) आणि जंगम ( एफ डी, रोकड, बँक खाते, शेअर्स, दागिने इ.) मिळकतीची यादी करण्यास आम्ही सांगतो आणि हे काम वेळ खावू आहे हे आपल्या लक्षात येईल.मृत्युपत्र हे लेखी असणे गरजेचे आहे.फक्त मुस्लिम धर्मीयांमध्ये ते तोंडी चालते. मृत्युपत्राची  भाषा ही सोपी आणि सुटसुटीत असावी. कोणाला काय द्यायचे ह्या बरोबरच  एखाद्याला  का काही द्यायचे नाही, हेही  सुस्पष्ट  लिहावे. 

३. मृत्यूपत्र कायदेशीर ठरण्यासाठी मृत्यूपत्रावर दोन सज्ञान साक्षीदारांनी सही करणे कायद्याने गरजेचे आहे. मृत्यूपत्र करणाऱ्याने आणि दोन साक्षीदारांनी एकमेकांसमोर मृत्यूपत्रावर सही करणे गरजेचे आहे.  २ साक्षीदारांनी एकाचवेळी सही केली पाहिजे असे काही नाही. त्याच प्रमाणे साक्षीदारांना मृत्युपत्रात काय लिहिले आहे, हे माहिती असणे अपेक्षित नाही. मृत्यूपत्रातील लाभार्थींना मात्र साक्षीदार होता येत नाही. शक्यतो साक्षीदार हे आपल्यापेक्षा कमी वयाचे असल्यास अधिक उत्तम. 
४. मृत्यूपत्र  करणाऱ्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम होती अश्या आशयाचे डॉक्टर चे सर्टिफिकेट असणे कायद्याने सक्तीचे नाही आणि केवळ ते नाही म्हणून मृत्यूपत्र बेकायदेशीर ठरत नाही. पण प्रॅक्टिकली असे सर्टिफिकेट असणे केव्हाही चांगले. 
५.. मृत्यूपत्रास कोणतीही  स्टॅम्प ड्युटी  लागत नाही, मृत्युपत्राची नोंदणी करणेही  कायद्याने बंधनकारक नाही. त्यामुळे खरेदी खत, बक्षीस पत्र  इ. दस्तांच्या तुलनेत मृत्यूपत्र तुलनेने  कमी खर्चाचा दस्त आहे.  मात्र नोंदणी कायदा, १९०८ मध्ये मृत्यूपत्राबद्दल काही विशेष तरतुदी आहेत. उदा. इतर कुठलेही दस्त हे अंमलात (execute )आणल्यानंतर ४ महिन्यानंतर नोंदवावे लागतात मात्र मृत्यपत्र हे, ते केल्यानंतर कधीही नोंदवता येते. त्याचप्रमाणे मृत्यूपत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर देखील ते नोंदवता येते. 
६. मृत्यूपत्र हे कितीही वेळा बदलता येते आणि सर्वात शेवटचेच मृत्यूपत्र ग्राह्य धरले जाते. बदलेल्या परिस्थितीमुळे मृत्यूपत्रामध्ये योग्य ते बदल करणे गरजेचे असते. परिस्थितीमध्ये बदल झाल्यास संपूर्ण मृत्यूपत्र  न बदलता पुरवणी-मृत्यूपत्र (codicil ) देखील करता येते आणि त्यास मृत्यूपत्राच्याच सर्व कायदेशीर तरतुदी लागू होतात. 
७. म्हातारपणीच मृत्यूपत्र करावे ह्या सर्वसाधारण समजाला कोरोनामुळे धक्का बसला आहे. वेळ काही सांगून येत नाही  सबब आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम असतानाच मृत्यूपत्र करणे इष्ट आहे. कुठल्या दिवशी मृत्यूपत्र करावे या बद्दल काही  कायद्यात तरतूद नाही. शक्यतो असा दिवस उदा जन्मदिवस, लग्नाचा वाढदिवस अश्या विशेष दिवशी मृत्यूपत्र करणे लक्षत राहू शकते. 
८. मृत्यूपत्राच्या अंमलबजावणीकरता एक किंवा अधिक व्यवस्थापक म्हणजेच executors नेमता येतात. मात्र असे करणे कायद्याने बंधनकारक नाही. 
कोर्टाने प्रोबेट सर्टिफिकेट  देणे म्हणजे संबंधित मृत्यूपत्र हे अस्सल आहे आणि कायदेशीरपणे अंमलात आणलेले आहे अशी पुष्टी देणे आणि एकदा का प्रोबेट मिळाले की ते सर्वांवर  बंधनकारक असते. मात्र मृत्युपत्राचे प्रोबेट घेणे हे फक्त मुंबई, चेन्नई  आणि कोलकोता ह्या मेट्रोपॉलिटिन शहरांमध्येच गरजेचे आहे. इतर ठिकाणी उदा. पुणे , त्याची  अजिबात नाही. व्यवस्थापक म्हणजेच executors नसल्यास कोर्टामधून "लेटर्स  ऑफ ऍडमिन्सट्रेशन " मिळवता येते. 
नॉमिनेशन मुळे मालकी  हक्क मिळत नाही. सबब मृत्युपत्र हे नॉमिनेशन किंवा वारसा कायदा ह्यांच्यापेक्षा वरचढ  असते. 
९. मृत्यूपत्र करणारा बोलायचा थांबला कि,मृत्यूपत्र बोलायला लागते म्हणजेच  मृत्युपत्राची अंमलबजावणी ही मृत्यूपत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतरच होते. आपल्या हयातीत मिळकत तबदील करण्यासाठी खरेदी खत, हक्क सोड पत्र , बक्षीस पत्र हे  पर्याय असतातच.  मृत्यूपत्र करणाऱ्याच्या इच्छेला सगळ्यांनी मान द्यावा. 

आपल्या मृत्यूनंतर आपल्या स्वकष्टार्जित मिळकतींसंदर्भात आपल्या वारसांमध्ये  वाद होऊ नयेत म्हणून आपल्या हयातीतीच मृत्यूपत्र करणे श्रेयस्कर असते. मात्र यासाठी इंटरनेटवरील अर्धवट माहितीच्या हळकुंडाने पिवळे होण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांच्या मृत्युपत्राची नक्कल करण्यापेक्षा ह्या कामी जाणकार वकीलांचा सल्ला घेणे कधीही इष्टच. 

धन्यवाद.. काळजी घ्या.. 

ऍड. रोहित एरंडे. ©

Comments

  1. WILL ला त्रयस्थ व्यक्ती किंवा संस्था आक्षेप घेऊ शकतात का किंवा वाद निर्माण करू शकतात का? उदाहरणार्थ LIC, Bank, CHSL etc.

    ReplyDelete
  2. WILL ला त्रयस्थ व्यक्ती किंवा संस्था आक्षेप घेऊ शकतात का किंवा वाद निर्माण करू शकतात का? उदाहरणार्थ LIC, Bank, CHSL etc.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©