फ्लॅटमधील पाणीगळती - सभासद आणि सोसायटी केव्हा जबाबदार ? ऍड. रोहित एरंडे ©
एखाद्या सभासदाच्या घरातून खालील सभासदाच्या घरात होणारी पाण्याची गळती वरील सभासद सोसायटीच्या सचिवाला अनेकवेळा लेखी कळवूनही थांबवत नसेल तर काय करावे ? पंखा काढावा लागला .आज सहा महिने झाले , माझ्याकडून गळती नाही , मी सिव्हिल इंजिनिअर आहे , स्लॅब खराब आहे हा कन्स्ट्रक्शनचा दोष आहे ,तुम्ही करून घ्या अशी मुक्ताफळे उधळण्यातच सहा महिने गेले .कृपया मार्गदर्शन करावे .
- एक त्रस्त सभासद
आपल्या सारखे प्रश्न अनेक सोसायट्यांमध्ये येत असतात आणि पाणी गळतीचा खर्च हा कोणत्या सभासदाने करायचा ? का सोसायटीने करायचा, हे नेहमीचे वादाचे मुद्दे समोर येतात. ह्या मध्ये एखाद्या फ्लॅटमधून होणारी गळती आणि सामायिक गच्ची, बिल्डिंगच्या भिंती ह्यामधून होणारी पाण्याची गळती ह्यासाठी खर्च कोणी करायचा ह्याच्या तरतुदी उपनियमांमध्ये दिलेल्या आहेत. सोसायटीच्या दुरुस्त उपनियम ६८ आणि १५९ (अ ) मध्ये सोसायटीने दुरुस्तीचे आणि देखभालीची कुठले कुठले खर्च करणे गरजेचे आहे, त्याची यादी दिलेली आहे. ह्या मध्ये सर्व प्रकारच्या पाण्याच्या गळत्या ज्यामध्ये पावसाच्या होणाऱ्या गळत्या आणि बाहेरील सामाईक पाईप तसेच मलनिःस्सारण वाहिनीमधून होणाऱ्या गळत्या ह्यांचा देखील समावेश होतो. तसेच पावसामुळे स्माईल गच्चीमधून होणाऱ्या गळतीमुळे टॉप फ्लॉवर फ्लॅटचे छत तसेच त्यावरील प्लास्टर खराब होणे, ह्या खर्चाचा समावेश होतो.
तर उपनियम ६८ (ब) आणि १५९ (ब ) मध्ये स्पष्टपणे हे नमूद केले आहे कि अनुक्रमे उपनियम ६८ आणि १५९ (अ ) मध्ये ज्या दुरुस्त्यांचा अंतर्भाव नाही, अश्या दुरुस्त्या सदस्यांनी स्वखर्चाने केल्या पाहिजेत आणि पुढे विशेष करून असे नमूद केले आहे कि "शौचालय /सिंकमुळे होणारी अंतर्गत गळती संबंधित सदनिकाधारकणारे स्वखर्चाने थांबविली पाहिजे आणि त्याबद्दलची माहिती त्याने संस्थेला दिली पाहिजे पाहिजे." आपल्या केसमध्ये जर का सोसायटी आणि विशेषकरून ज्याच्या घरातून गळती होत आहे, तो सभासद जर स्वतःहून अशी गळती थांबविण्यासाठी काहीच हालचाल करत नसेल, तर तुम्हाला त्या सभासदाला आधी वकीलांमार्फत नोटीस द्यावी आणि नोटीस देऊनही त्याने न ऐकल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येईल . त्याचप्रमाणे अश्या सभासदाविरुद्ध महानगर पालिकेच्या आरोग्य खात्याकडे देखील 'पाणी गळतीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे" असा तक्रार अर्ज करता येईल. जर बांधकामामध्ये त्रुटी असतील किंवा निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले असेल तर आता रेरा कायद्याप्रमाणे, रेरा कायदा लागू असलेल्या बिल्डिंग मधील जागेचा ताबा मिळाल्यापासून ५ वर्षांच्या आत अश्या त्रुटी बिल्डरच्या निदर्शनास आणल्यास त्या नीट करून देण्याची जबाबदारी बिल्डरवर आहे. मात्र जो पर्यंत तुम्ही कोणतीही कारवाई करत नाही, तो पर्यंत प्रश्न सुटणार नाही. बऱ्याचदा सभासद कोर्टात कोण जाणार ? असा विचार करून काहीच करत नाहीत आणि ह्याने कुठलेच प्रश्न सुटत नाहीत.
सोसायटीच्या बाबतीत २००६ साली मा. मुंबई उच्च न्यायालयाने 'हंबल को.ऑप. सोसायटी विरुद्ध शाम आणि लता बलानी' ह्या केसमध्ये लता बलानी ह्यांच्या फ्लॅटमध्ये टॉप टेरेस मधून होत असलेल्या पाणी गळतीच्या दुरुस्तीसाठी सोसायटीला जबाबदार धरले. तसेच पाम बीच सोसायटी, नवी मुंबई विरुद्ध सलील बोस' २०१७ ह्या केस मध्ये महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोगाने 'बिल्डिंग सुयोग्य स्थितीमध्ये ठेवण्याची जबाबदारी सोसायटीची असल्यामुळे सामाईक गच्चीवरील वॉटरप्रूफिंगचा खर्च करण्यास सोसायटी बांधील आहे" असा निकाल दिला. सोसायटीमधील बहुतांशी वाद हे इगोमधून निर्माण झालेले असतात आणि सामंजस्याने सोडविल्यास सुटू शकतात आणि कोर्टात खर्च होणारा वेळ आणि पैसा वाचू शकतो. असो.
धन्यवाद.
ऍड. रोहित एरंडे ©
Comments
Post a Comment