पत्नीच्या मिळकतीचे वारस कोण ? ॲड. रोहित एरंडे. ©

पत्नीच्या मिळकतीचे वारस कोण ? 

ॲड. रोहित एरंडे. ©

सर, तुमचे आणि म.टा. चे विशेष आभार. या लेखमालेमुळे अनेक शंका घरबसल्या सुटायला मदत होते. मागच्या आठवड्यातील तुमच्या लेखाला अनुसरून प्रश्न विचारतो की समजा पत्नी आधी मयत झाली तर तिच्या नावावर असलेली मिळकत पतीलाच मिळते की तिच्या मुलाबाळांचा आणि माहेरच्या लोकांचा काही हक्क असतो ?.


एक वाचक पुणे. 


सर्वप्रथम आपले आभार की आमच्या लेखमालेमुळे लोकांना त्यांचे कायदेशीर प्रश्न सुटायला मदत होत आहे हे वाचून संतोष वाटला. असो. आता याबाबत कायदेशिर तरतुदी का आहेत यांचा थोडक्यात आढावा घेऊ.


स्त्रिया मिळकतीच्या पूर्ण मालक !


हिंदू वारसा कायद्याच्या कलम १४ अन्वये स्त्रियांना एखादी स्थावर / जंगम मिळकत वारसाने, वाटपाने, पोटगीसाठी किंवा पोटगीच्या फरकापोटी, मृत्यूपत्र किंवा बक्षीसपत्र किंवा खरेदीखात अश्या दस्तांनी, स्त्रीधनापोटी इ. प्रकारे आणि कोणाकडूनही मिळाल्यास ती स्त्री अश्या मिळकतींची संपुर्ण मालक होते. ह्याला अपवाद म्हणजे अश्या दस्तांनी जर मिळकतींमध्ये फक्त तहहयात राहण्याचा हक्क (life interest ) दिला असेल तर त्यामध्ये असा मालकी हक्क मिळत नाही.


आता तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे वळू.


जर एखादी हिंदू स्त्री मृत्यूपत्र न करता मरण पावली तर तिची मिळकत कलम १५ (१) प्रमाणे सर्वात प्रथम तिचा नवरा, मुलगा-मुलगी, जर मुलगा -मुलगी आधीच मयत झाली असल्यास त्यांची मुले (नातवंडे) ह्यांच्यामध्ये समानरीत्या विभागली जाईल. 


(मात्र आई पूर्वीच मयत झालेल्या मुलाला - मुलीला समजा ते त्यांची आई मयत झाली तेव्हा जिवंत असते आणि तेव्हा जेवढा हक्क मिळाला असता तेवढाच हक्क त्यांच्या मुला - मुलींना (नातवंडांना) पुढे मिळेल. )


ह्यांच्यापैकी कोणीच नसेल तर मग नवऱ्याचे वारसांकडे आणि ते नसतील तर स्त्रीच्या आई-वडीलांकडे , तेही नसतील तर वडिलांच्या वारसांकडे आणि शेवटी आईच्या वारसांकडे मिळकत जाईल. 


महत्वाचा अपवाद :    


कलम १५(२) च्या अपवादाप्रमाणे जर महिलेला एखादी मिळकत तिच्या वडील किंवा आईकडून मिळाली असेल आणि ती महिला निपुत्रिक (in absence of any issue ) असेल किंवा तिचे मुलगा-मुलगी किंवा जर मुलगा -मुलगी आधीच मयत झाली असल्यास त्यांची मुले (नातवंडे) ह्यांपैकी कोणीहि वारस हयात नसेल तर अशी मिळकत वर नमूद केल्याप्रमाणे प्रमाणे न विभागली जाता केवळ त्या महिलेच्या वडिलांच्या वारसांकडेच जाईल. तसेच जर का मिळकत नवऱ्याकडून किंवा सासऱ्यांकडून आली असेल आणि वरीलप्रमाणेच ती निपुत्रिक असेल , तर अशी मिळकत हि त्या स्त्रीच्या मृत्यूनंतर फक्त तिच्या नवऱ्याच्या वारसांकडे जाईल. 'स्त्रीच्या मृत्यूनंतर अशी मिळकत हि मिळकतीच्या उगमाकडेच जाईल' हा कलम १५(२) मधील वरील अपवाद पुरुषांबाबत मात्र दिसून येत नाही ! 

तरीही परत एकदा मृत्यूपत्र 'वेळीच करून ठेवण्याचे' महत्व जाणून घ्या. कारण मृत्युपत्र असेल तर वारसा कायदा लागू होत नाही. Will prevails over Succession & Nomination 


ॲड. रोहित एरंडे. ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©