देशद्रोह कायद्याची पार्शवभूमी : लो. टिळकांचा बाणेदारपणा
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीयांमध्ये इंग्रजी राजवटीविरुद्ध असंतोष निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' या घोषणेमुळे भारतीयांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली.
लोकमान्य टिळकांवरील पहिला देशद्रोहाचा खटला म्हणून हा ओळखला जातो.. टिळकांच्या ह्या अग्रलेखामुळे लोकांच्या भावना भडकल्या आणि सरकारविरुद्ध लोकांच्या मनात अप्रिती निर्माण झाली, हा आरोप ६ इंग्रजी ज्युरींनी मान्य करून टिळकांना १८ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. मात्र ३ भारतीय ज्युरींचा विरोध तोकडा पडला. मात्र न्या. स्ट्रॅची यांनी केलेल्या "डिसअफेक्शन" (सरकारबद्दलची अप्रिती) म्हणजेच "वॉन्ट ऑफ अफेक्शन" (प्रीतीचा अभाव) या व्याख्येमुळे त्यांच्यावर जगभर टीका झाली.
१९०९ च्या सुमारास खुदिराम बोस यांनी सेशन जज किंग्जफोर्ड ह्यांना मारण्यासाठी बॉम्ब टाकला, मात्र त्यात २ ब्रिटिश महिला मृत्युमुखी पडल्या. त्या विरुद्ध परत एकदा ब्रिटिश सरकारने दडपशाही सुरु केली आणि टिळकांनी परत एकदा "देशाचे दुर्दैव" ह्या अग्रलेखाद्वारे बॉम्बस्फोटाचं निषेध केला, मात्र लोकांनी असे करण्यामागे सरकारची दडपशाही कारणीभूत आहे आणि त्यामुळे सरकारने लोकांच्या भावनांची कदर करावी असा टोला लगावला. ह्यां नंतर "हे उपाय टाकाऊ नाहीत " हा दुसरा अग्रलेख लिहून टिळकांनी बॉम्बगोळ्यांचे वर्णन जादू, मंत्र, ताईत असे केले. त्यातच टिळकांच्या गायकवाडवाड्यामधील झडतीमध्ये स्फोटक पदार्थांबद्दलची पुस्तके सरकारला सापडली आणि टिळकांविरुद्ध दुसरा खटला दाखल झाला.
आधीच्या खटल्यातील टिळकांचे वकील असलेले डावर हे आता न्या. डावर झाले होते. "एका बाजूला बलवान सरकार आणि दुसऱ्याबाजूला सामान्य लोक, ह्यांच्या झगड्यात मी लोकांच्या भावना पोचविण्याचे काम मी करत आहे" हा लोकमान्य टिळकांचा युक्तिवाद न्या. डावर ह्यांनी अमान्य करताना नमूद केले की संपादकाने सरकारवर जरूर टीका करावी, मात्र हेतू अनैतिक आणि अप्रामाणिक नसावा आणि अखेर ७ विरुद्ध २ अश्या मतांनी ज्युरींनी टिळकांना दोषी ठरविले.
मात्र "ज्युरींनी निर्णय दिला तरी मी निर्दोषच आहे. न्यायालयांहून सर्वोच्च शक्ती असलेल्या परमेश्वराचीच हि इच्छा दिसते की मी मी निर्दोष सुटण्याऐवजी तुरुंगात राहिल्यानेच माझ्या कार्यास उर्जितावस्था येईल" हे लोकमान्य टिळकांचे शब्द आजही मा. मुंबई उच्च न्यायालयात कोरलेले आहेत.
ॲड. रोहित एरंडे ©
Comments
Post a Comment