डॉक्टर वाचले तरच आपण वाचू, हे लोकांना कधी समजणार ? ऍड. रोहित एरंडे ©
डॉक्टर वाचले तरच आपण वाचू, हे लोकांना कधी समजणार ?
ऍड. रोहित एरंडे ©
दिल्लीमधील कुप्रसिध्द निर्भया प्रकरणाप्रमाणेच कोलकात्यामधल्या आर. जी. कर मेडिकल कॉलेज रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली.त्यानंतर या घटनेचा निषेध करण्यासाठी देशभरात आंदोलनं सुरू झाली आहेत. दुर्दैवाची बाब अशी या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी डॉक्टरांचे जे विरोध प्रदर्शन चालू होते त्यामध्येच अचानक जमाव रुग्णालयात घुसला आणि अनियंत्रित जमावाने रुग्णालयात तोडफोड केली. इमर्जन्सी वॉर्डला लक्ष्य केलं आणि डॉक्टर्स, स्टाफला मारहाण केली. इतकेच नव्हे तर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. आता यावरून राजकारण सुरु झाले आहे. पण यासर्वामध्ये डॉक्टरांची सुरक्षितता हा मुद्दा दरवर्षीप्रमाणेच ऐरणीवर आला आहे.
कोरोना जागतिक महामारीमध्ये सरकार बरोबर सर्वात पुढे होऊन डॉक्टर आणि त्यांचे सहकारी जीवाचे रान करीत असताना देखील डॉक्टरांवर हल्ल्याचे प्रकार झाल्यामुले अखेर केंद्र सरकारला महामारी कायद्यामध्ये दुरुस्ती करावी लागली आणि कठोर शिक्षेची तरतूद करावी लागली. उपचार आवडले नाहीत किंवा निष्काळजीपणा झाला म्हणून डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण एवढे आहे कि यामध्येच कोणी 'डॉक्टरेट' करू शकेल असे उपहासाने म्हणावे लागेल. मात्र झालेला प्रकार हा उपचारातील निष्काळजीपणाचा नव्हता, तर निष्काळजी पुरुषी प्रवृत्तीचा होता.
इतर कुठल्याही प्रोफेशन पेक्षा डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप म्हणून ओळखले जाते आणि इथे भक्तांची गल्लत होते. डॉक्टर जर का देव असेल, तर त्याची विटंबना (हल्ला )करू नका....आणि...डॉक्टर जर का देव नसेल तर, त्याच्या मर्यादा ओळखा... जर आता डॉक्टरांचे अशा हल्ल्यांपासून रक्षण केले नाही, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. समजा डॉक्टरांनी ह्या कठीण परिस्थितीमध्ये उपचार करण्यास नकार दिला तर ?
वैद्यकशास्त्रामध्ये रोज काही ना काही नवीन शोध लागत असतात. त्याची व्याप्ती प्रचंड आहे, त्यामुळेच वैद्यकशास्त्र हे सतत विकसित होत असलेले शास्त्र आहे. .‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असल्याने उपचारांचा परिणामही वेगवेगळा ठरतो. एखाद्या आजारावर उपचार करण्याच्या वेगवेगळ्या; पण मान्यताप्राप्त व वर्षानुवर्षे वापरलेल्या पद्धती असतात. प्रत्येक उपचार पद्धतीला त्याचे फायदे-तोटे असतात, त्यामुळे संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्या ज्ञानाचा व कौशल्याचा पुरेपूर उपयोग करूनदेखील जर दुर्दैवाने उपचारास यश आले नाही तर त्याचा दोष डॉक्टरांना देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालांमध्ये स्पष्ट केले आहे. कोणत्याही डॉक्टरला आपला पेशंट मरावा असे वाटणार नाही.
त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने निष्काळजीपणापोटी डॉक्टरांवर दाखल होणाऱ्या खोट्या गुन्ह्यांबद्दलही असे म्हटले आहे, की जर प्रत्येकवेळी असे गुन्हे दाखल व्हायला लागले तर डॉक्टरांना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजाकरिता करणे अवघड होऊन बसेल व अशाने समाजाचेच प्रचंड नुकसान होईल. हे विधान डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबतदेखील तंतोतंत लागू पडेल.एखाद्या रुग्णाने उपचारास प्रतिसाद दिला नाही किंवा दुसरीकडे उपचार नीट होऊ शकतील असा सल्ला दिला तर यात डॉक्टरांची चूक कशी असू शकेल, याचा विचार न करता एकदम जाऊन डॉक्टरांना बेदम मारायचे, हॉस्पिटलची मोडतोड करायची, यातून काहीच साध्य होत नाही. उलट डॉक्टरांना रुग्णाबद्दल वाटणारी आपुलकी कमी होते. हे रुग्णांसाठी जास्त धोकादायक आहे.
आपण बेफाम पणे गाडी चालवायची आणि जबर जखमी होऊन परिस्थिती हाताबाहेर गेली, किंवा डॉक्टरांनी दारू पिऊ नका असे सांगितले तरी खूप प्यायची आणि मग किडन्या - लिव्हर निकामी झाली कि त्या परत उत्तम व्हाव्यात म्हणून डॉक्टरांकडे जायचे किंवा रिपोर्ट मध्ये शुगर कमी दिसावी म्हणून फक्त 2 दिवस अजिबातच गोड खायचे नाही आणि मग शुगर कमी होत नाही म्हणून शेवटी बोंब मारायची आणि ह्या सर्व प्रकारात गुण आला नाही म्हणून शेवटी डॉक्टरांनाच मारायचे, असे काहीसे प्रकार घडत असतात..
याचा अर्थ डॉक्टरविरुद्ध काहीच कारवाई करता येत नाही का? कुठलयही व्यासायिकांपेक्षा डॉक्टरांविरुद्ध दाखल होणाऱ्या केसेसचे प्रमाण खूप आहे. अप प्रवृत्ती ह्याही व्यवसायात आहेतच की. वैद्यकीय निष्काळजीपणाच्या खटल्यांत आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने संयत निर्णय दिलेले आहेत. योग्य तेथे १२ कोटी रुपयांची नुकसानभरपाईही रुग्णाला दिलेली आहे; तर त्याचबरोबर फौजदारी कारवाईचे निकषदेखील घालून दिलेले आहेत. उजव्या हाता ऐवजी डाव्याच हाताचे ऑपेरेशन केले, एखाद्या शाखेचे ज्ञान नसतानादेखील त्या शाखेसंदर्भात उपचार केले, ऑपरेशन नंतर पोटात कापसाचा गोळा विसरणे अशा प्रकरणांत डॉक्टरांना न्यायालयाने जबर दंड अथवा शिक्षा केलेल्या आहेत. धर्म रक्षति
जर एखाद्या रुग्णास वाटले, की डॉक्टर निष्काळजीपणे वागले असतील तर संबंधित डॉक्टरांविरुद्ध कायद्याच्या चौकटीत राहून दिवाणी तसेच फौजदारी तक्रार दाखल करता येते. असे असूनसुद्धा दंडेलशाहीच्या जोरावर डॉक्टरांना लक्ष्य करण्याच्या प्रकारामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्यात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याकरिता आता केंद्रीय स्तरावरच डॉक्टर संरक्षण कायदा आणणे गरजेचे आहे. याकरिता डॉक्टरांनी व त्यांच्या शिखर संघटनांनीच पावले उचलण्याची गरज आहे.
२०१० सालच्या महाराष्ट्र सरकारच्या कायद्या प्रमाणे खासगी अथवा सरकारी रुग्णालये, डॉक्टर, कर्मचारी, नर्स, वॉर्डबॉय, मेडिकलचे विद्यार्थी इ.ना या कायद्याच्या संरक्षण कक्षेत आणले आहे. जी व्यक्ती अशा डॉक्टर इ.वर हल्ला करेल किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून हल्ला करून घेईल त्या व्यक्तीस या कायद्याखाली दोषी धरून ३ वर्षे कैद आणि/ अथवा रु. ५० हजार दंड अशी शिक्षा होऊ शकते. या कायद्याखालचा गुन्हा हा दखलपात्र व अजामिनपात्र आहे. जर गुन्हेगारामुळे हॉस्पिटलच्या यंत्रसामग्रीचे अथवा मालमत्तेचे नुकसान झाले असेल, तर यंत्रांच्या किमतीच्या दुप्पट रक्कम; तसेच प्रॉपर्टीच्या नुकसानाची न्यायालय ठरवेल ती किंमत संबंधित गुन्हेगाराकडून वसूल करण्याची महत्त्वाची वेगळी तरतूद हे या कायद्याचे वैशिष्ट्य आहे. रक्कम जर तो गुन्हेगार देऊ शकला नाही, तर त्याचे घरदार जप्त करून अशा रकमेची वसुली करता येईल, असेही पुढे म्हटले आहे.
सध्या डॉक्टर-पेशंट ह्यांचे नातेसंबंध हे दुष्टचक्रात अडकलेले आहे. एकमेकांवरील विश्वास वाढणे हे एकंदरीतच समाज स्वास्थ्याच्या द्रुष्टीने खूप गरजेचे आहे. धर्मो रक्षति रक्षितः असे सुप्रसिध्द संस्कृत वाचन आहे. ज्याचा अर्थ तुम्ही धर्माचे (चांगल्या गोष्टींचे) रक्षण केले तरच तो तुमचे रक्षण करेल,. इथे धर्मा ऐवजी डॉक्टर हा शब्द घालून बघा.. नाहीतर एकदिवस आपल्या सर्वांनाच 'औषधांसाठी ' फक्त गूगलवरच अवलंबून राहावे लागेल, यात अतिशोयोक्ती नाही.
ऍड. रोहित एरंडे.©
Comments
Post a Comment