झाड एकाचे, फांद्या दुसरीकडे मग फळांवर हक्क कोणाचा ? ॲड. रोहित एरंडे ©
आमच्या सोसायटीमध्ये आंब्याची काही मोठी झाडे आहेत. मात्र त्यांच्या फांद्या शेजारच्या सोसायटीमध्ये गेल्या आहेत. आता बऱ्याचवर्षांनी आंब्याच्या मौसमात या झाडांना चांगले आंबे आले आहेत आणि हे आंबे कोणी घ्यायचे यावरून वाद-विवाद दोन्ही सोसायट्यांच्या सभासदांमध्ये सुरु झाले आहेत. आमचे म्हणणे आहे की झाड आमचे असल्यामुळे आंबे आम्हीच घेणार, तर शेजारची सभासद म्हणतात फांद्या आमच्या भागात आल्यामुळे, त्याचा कचरा आम्ही साफ करतो त्यामुळे आम्हीच आंबे घेणार. या बाबतीत काही कायदा आहे असे ऐकले , तर कृपया मार्गर्दर्शन करावे.
सोसायटी पदाधिकारी, पुणे.
हा प्रश्न वाचून अनेकांना लहानपणी दुसऱ्याच्या झाडावरील पाडलेले आंबे, चिंचा यांची आठवण झाली असेल. पण कायदेशीर तरतुदींकडे वळण्यापूर्वी सोसायटीबाबत एक निरीक्षण नोंदवावेसे वाटते की (सोसायटीमधील) बहुतांशी वाद हे इगो मधून आणि "हमसे आया ना गया - तुमसे बुलाया ना गया" सारख्या विचारसरणीतून - संवादाच्या अभावातून होतात. "तुटे वाद, संवाद तो हितकारी" म्हणजेच सुसंवाद केल्यास वाद टाळता येतात हे रामदास स्वामी का म्हणून गेलेत हे आता कळेल. असो.
तर आपण म्हणालात तसे, होय, याबाबत कायदेशीर तरतुदी आहेत आणि त्या ब्रिटिशांनी केलेल्या Indian Easement Act १८८२ मध्येच आणि काही अंशी टॉर्ट कायद्यामध्ये मध्ये आहेत ! या महत्त्वाच्या आणि क्लिष्ट कायद्याचे सार असे म्हणता येईल की विशिष्ट परिस्थितीमध्ये जागा आपली असली तरी अन्य व्यक्तीला काही प्रमाणात आणि काही गोष्टींबाबत हक्क मिळू शकतो आणि त्याला आपल्याला आडकाठी करता येत नाही. उदा. जाण्या-येण्याचा रस्ता वापरण्याचा अधिकार , किंवा आपल्याला दुसऱ्याच्या मिळकतीमधून पाणी घेण्याचा हक्क किंवा हवा -उजेड मिळण्याचा हक्क.इ. तरीही प्रत्येक केसच्या फॅक्टस या आधी तपासाव्या लागतातच.
आपण उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी केरळा उच्च न्यायालयाच्या १९८७ सालच्या निर्णयाचा आधार घेता येईल (संदर्भ : मणिक्कम वि. कमला, AIR १९८७ KER ७२) या निर्णयाप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या मालकीच्या झाडाच्या फांद्या जर दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीच्या जागेवर येत असतील तर त्यावरअश्या फांद्यांवर झाड मालकाचा कसलाही अधिकार नसतो आणि त्यामुळे अश्या फांद्यांना आलेल्या फळा -फुलांवरही झाड मालकाचा हक्क उरत नाही. हा निकाल देण्यासाठी न्यायमूर्तींनी ब्रिटिश कालीन विविध निकालांचा आधार घेतल्याचे दिसून येते. या केसमध्ये प्रतिवादीच्या मालकीच्या ताब्यातील झाडांच्या मोठाल्या फांद्या वादीच्या जागेवर पसरल्या होत्या आणि त्यामुळे वादीला बांधकाम करण्यास अडथळा येत होता आणि प्रतिवादी फांद्या कापण्यास नकार देत होता. सबब उच्च न्यायालायने निकाल दिला की आपल्या मालकीच्या झाडाच्या फांद्या दुसऱ्याचा जागेवर न वाढून देण्याची जबाबदारी मालकावर आहे आणि ती खबरदारी त्याने घेतली नाही, तर अश्या दुसऱ्या व्यक्तीला त्या फांद्या कापण्याचा अधिकार आहे. आपल्या केसमध्येही असेच दिसून येते. दुसऱ्याच्या जागेत विनापरवाना जाऊन त्यांच्या झाडाची फळे तोडणे हा ट्रेसपास होऊ शकतो, पण दुसऱ्याच्या झाडाच्या फांद्या ज्या आपल्याकडे आल्या आहेत त्याची फळे घेणे हा काही ट्रेसपास होत नाही.
त्यातच आपल्या झाडाच्या फांद्यांमुळे दुसऱ्याच्या अंगणात कचरा होत असल्यास तेव्हा ती दुसरी व्यक्ती आपल्याला कचरा उचलण्यास सांगत नाही, मग फळांबाबत मात्र हक्क कसा दाखवता येईल, असे या निकालाचे सार आहे. मात्र आपल्याकडे झाडे अथवा फांद्या तोडण्यासाठी महाराष्ट्र शहरी विभाग वृक्ष संवर्धन कायदा १९७५ याच्या तरतुदी सर्वांना (चंदनचोर सोडून !) लागू होतात हे लक्षात घ्यावे. आपण सर्वच सूज्ञ आहात त्यामुळे ज्यांनी झाडे लावली त्यांना धन्यवाद देऊन यातून मध्यम मार्ग नक्कीच निघेल असे बघावे , नाहीतर प्रकरण कोर्टात गेले तर दोघांनाही आंबे विकत घेणे परवडले असते असे वाटायला नको.
ॲड. रोहित एरंडे ©
Comments
Post a Comment