पतीच्या मृत्यूनंतर मिळकतीचे वारस कोण ? ॲड. रोहित एरंडे.©
पतीच्या मृत्यूनंतर मिळकतीचे वारस कोण ?
ॲड. रोहित एरंडे.©
माझ्या आणि माझ्या पतीच्या नावे एक फ्लॅट आहे. माझ्या पतीचे मागच्या वर्षी आकस्मिक निधन झाले. त्यांनी कोणतेही मृत्यूपत्र केले नव्हते. मूळ ऍग्रिमेंट मध्ये पहिले नाव माझ्या पतीचे आणि दुसरे माझे आहे. आम्हाला मूल बाळ नाही. मला सासू सासरे आहेत, पण त्यांच्याशी संबंध चांगले नाहीत, त्या सारख्या मला पाण्यात पाहतात आणि आता सासूबाई सारखा हिस्सा मागत आहेत ? तर नवऱ्याचा हिस्सा मला एकट्यालाच मिळेल, का सासू-सासऱ्यांना पण ?
श्रीमती XXX ,मुंबई.
आपल्यासारखे प्रश्न बऱ्याच जणांना पडतात. अनेक लोकांना असे वाटत असते कि वैवाहिक साथीदाराच्या मृत्यूनंतर उर्वरित जोडीदाराच आपोआप एकटा १००% मालक बनतो. तसेच अनेक गैरसमज असा आहे कि पहिले नाव ज्याचे असते त्याचा हिस्सा किंवा अधिकार हा दुसरे नाव असलेल्यापेक्षा जास्त असतो आणि पहिले नाव असलेली व्यक्ती मयत झाली कि आपोआप सर्व हक्क दुसरे नाव असलेल्या व्यक्तीलाच मिळतो.
एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा व्यक्तींच्या हयातीमध्ये खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र इ. नोंदणीकृत दस्तानेच, तर हयातीनंतर मृत्युपत्राने किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने तबदील (ट्रान्सफर) होतो. तुमच्या केसमध्ये तुमचा आणि तुमच्या पतींचा समान अविभक्त हिस्सा होता, कारण करारनाम्यामध्ये कोणाचे नाव कुठल्या क्रमांकावर आहे याने हिस्सेवारी आणि हक्क अधिकार ठरत नाहीत.
तुमचे पती मृत्युपत्र न करता मयत झाल्यामुळे हिंदू वारसा कायद्याच्या कलम ८ अन्वये त्यांचा हिस्सा सर्व प्रथम क्लास-१ हेअर्स (वारस) यांच्यामध्ये विभागला जाईल. क्लास-१ हेअर्स मध्ये प्रामुख्याने मयत पुरुषाची विधवा पत्नी, मुलगा -मुलगी (मुले) ,आई , मुले आधीच मयत झाली असल्यास त्यांची मुले (नातवंडे), मुलाची विधवा पत्नी (सून) इ. चा समावेश होतो, आणि या सर्व वारसांना समान पद्धतीने मिळेल आणि जर का क्लास-१ वारसांपैकी कोणीही नसेल, तर मग क्लास-२ वारसांकडे ज्यामध्ये प्रामुख्याने वडील, मुलाच्या किंवा मुलीच्या मुलीचा मुलगा किंवा मुलगी (पतवंडे), भाऊ -बहीण, चुलते इ. यांचा समावेश होतो. मात्र हिंदू स्त्री मृत्युपत्र न करता मयत झाल्यास तिच्या मिळकतीची विभागणी वेगळ्या पद्धतीने होते. असो.
तुमचे केसमध्ये पतीचा ५०% अविभक्त हिस्सा हा तुम्ही, तुमची सासूबाई यांच्यामध्ये समानरित्या प्रत्येकी २५%-२५% असा विभागला जाईल, पण सासऱ्यांना काहीही हक्क मिळणार नाही, कारण वडील हे क्लास-२ चे वर होतात ! त्यामुळे तुमचा हिस्सा हा स्वतःचा ५०% अधिक पतीचा २५% एवढा होईल. आता सासूबाई तुमच्याशी नीट वागत नाहीत, याला अनेक पैलू असणार आहेत आणि टाळी एका हाताने वाजत नाही. सासू-सून हे नाते (सन्माननीय अपवाद वगळता) माय -लेकींसारखे असते असे नाही असे बरेचदा कोर्टात, विशेषतः कौटुंबिक वादात दिसून येते. सासू - सुनेचे "ना—ते" ? असे का म्हणतात ?"यांना साखर जरी दिली तरी म्हणतील , जरा अजून गोड चालली असती" असे संवाद सासू-सुनेच्या नात्यात एकमेकांबद्दल ऐकले आहेत. असो. महिलांच्या बाबतीत अगदी थोडे अपवाद वगळता, त्यांना मिळालेली मिळकत हि त्यांची स्वकष्टर्जित समजली जाते. त्यामुळे तुम्हाला आवडो - न आवडो सासूबाईंचा २५% अविभक्त हिस्सा त्यांचा स्वतःचा मालकीसारखा झाल्याने त्या त्याचे काहीही करू शकतात. या करिता उभयतांनी मध्यस्थांची मदत घेऊन जुने वाद संपवून यातून मार्ग काढावा, आणि communication वाढवावे कारण communication नसेल तर वाद मिटू शकणार नाहीत. 'तुटे वाद संवाद तो हितकारी' हे समर्थ वचन सर्वत्र उपयोगी पडते.
पण तुमच्या प्रश्नामुळे परत एकदा मृत्यूपत्राचे महत्व देखील अप्रत्यक्षपणे अधोरेखित झाले आहे. मृत्यूपत्र केले असेल तर वारसा कायद्याला बगल देता येते, हे लक्षात घ्यावे. मृत्युपत्राला स्टँम्प ड्युटी लागत नाही, नोंदणी केल्यास उत्तम. त्यामुळे तरी तुम्ही कमीतकमी आता तुमच्या हिश्शयापुरते आणि तुमच्या इतर स्थावर-जंगम मिळकतीसाठी तरी मृत्युपत्र करून ठेवा.
ॲड. रोहित एरंडे.©
Comments
Post a Comment