छळणुकीपासून डॉक्टरांना 'सर्वोच्च' दिलासा ॲड. रोहित एरंडे ©

 छळणुकीपासून डॉक्टरांना 'सर्वोच्च' दिलासा

ॲड. रोहित एरंडे ©

सर्वच डॉक्टरांना एकच चष्म्यातून बघणे चुकीचे आहे. उडदामाजी काळे-गोरे असणारच. न्यायालयाचा वैद्यकीय निष्काळजीपणाबद्दलचा दृष्टिकोन कायम संयत राहिला आहे. त्याबद्दल थोडेसे.. 


* वैदयकशास्त्राला Incomplete Science असे संबोधले जाते.*

वैद्यकशास्त्राचे मानवजातीवर अनंत उपकार आहेत. ते एक अत्यंत प्रगत असे शास्त्र असून, दररोज त्यात काहीतरी नावीन्यपूर्ण शोध लागत आहेत. मात्र, असे असले तरी वैद्यकशास्त्राला परिपूर्ण शास्त्र असे म्हणता येणार नाही इतका त्याचा आवाका मोठा आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती असल्याने उपचारांचा परिणामही वेगवेगळा ठरतो. एखाद्या आजारावर उपचार करण्याच्या वेगवेगळ्या; पण मान्यता प्राप्त व वापरलेल्या पद्धती असू शकतात. प्रत्येक पद्धतीचे फायदे व तोटे असतात. अशापैकी प्राप्त परिस्थितीत डॉक्टरांनी त्यांच्या ज्ञानाच्या व कौशल्याच्या आधारे निवडलेल्या उपचारपद्धतीला यश न आल्यास त्या डॉक्टरला वैद्यकीय निष्काळजीपणासाठी दोषी धरायचे का, असा प्रश्न कुसुम शर्मा वि. बात्रा हॉस्पिटल (AIR 2010 SC 1050) या याचिकेच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयापुढे उपस्थित झाला. अर्थातच या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी देताना सर्वोच्च

न्यायालयाने एकूणच वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणजे काय यासंबंधी आपल्याकडील; तसेच इंग्लंडमधील अनेक निकालांच्या आधाराने उहापोह केला आहे. पतीच्या पोटातील डावा अॅड्रेनल ट्यूमर काढण्यासाठी पोस्टेरिअर पद्धतीऐवजी 'अॅनटेरिअर' पद्धतीचा अवलंब केल्याने गुंतागुंत निर्माण होऊन पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरांविरुद्ध केलेल्या याचिकाकर्तीचा दावा राष्ट्रीय ग्राहक आयोगाने फेटाळल्यामुळे प्रकरण सर्वोच्च न्यायालायापर्यंत पोहोचते. न्या दलवीर भंडारी व न्या. बेदी यांनी अतिशय अभ्यासपूर्ण असा निकाल देताना डॉक्टरांना वैद्यकीय निष्कळजीपणाच्या नावाखाली होणाऱ्या छळवणुकीपासून चांगलाच दिलासा दिला आहे.


* वकील, आर्किटेक्ट इ. व्यावसायिक देखील आपल्या अशिलांना १००% यशाची खात्री देवू शकत नाहीत.*

न्यायालय म्हणते, की 'वैद्यकशास्त्राचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. प्रत्येक शस्त्रक्रियेमध्ये धोका अंतर्भूत असतातच व असे धोके स्वीकारल्याशिवाय फायद्यांची अपेक्षा करणेही चुकीचे ठरेल.' न्यायालायाने पुढे नमूद केले आहे, की वकील, डॉक्टर, आर्किटेक्ट इ. स्वतंत्र व्यावसायिकांकडे काहीतरी वैयक्तिक कौशल्य असते व यासाठी आपापल्या विषयांचा त्यांनी अभ्यासही केलेला असतो. मात्र, यापैकी कोणीही आपापल्या अशिलांना १०० टक्के यशाची खात्री देऊ शकत नाही. त्यांच्या हातात आपल्या ज्ञानाचा प्रामाणिकपणे उपयोग करणे एवढेच असते. 

त्यामुळे अशा व्यावसायिकांना निष्काळजीपणाबद्दल दोषी धरायचे असेल, तर पुढील दोनपैकी एक गोष्ट सिद्ध होणे गरजेचे आहे. १) त्या व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानाचा, कौशल्याचा अभाव किंवा २) प्राप्त परिस्थितीमध्ये आहे त्या ज्ञानाचा, कौशल्याचा योग्यरीतीने वापर न करणे. प्रत्येक व्यावसायिकाने तो प्रॅक्टीस करत असलेल्या शाखेमध्ये अत्युच्च दर्जाचे कौशल्य आत्मसात केलेच पाहिजे असे नाही, असे पुढे न्यायालयाने नमूद केले आहे. बऱ्याच वेळा एखाद्या इमर्जेंसी केसमध्ये डॉक्टरांपुढे 'इकडे आड तिकडे विहीर' अशी परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टरांना जास्त धोका असलेली;

परंतु रुग्णासाठी जास्त फायदेशीर अशी उपचारपद्धत निवडावी लागते व अशा वेळी  यशस्वी ठरले, तर डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप लावणे चुकीचे ठरेल, यासाठी रुग्णाकडून पूर्व उपचार संमती (Informed Consent) घेणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने शेवटी एकंदरीतच डॉक्टरांना वैद्यकीय निष्काळजीपणाबद्दल दोषी धरण्याआधी महत्त्वाची तत्त्वे घालून दिली आहेत.

१. निष्काळजीपणा म्हणजे प्राप्त परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणूस सारासार विवेकबुध्दी वापरून जी गोष्ट करेल ती न करणे किंवा जी गोष्ट केली नाही पाहिजे तीच करणे.

२. वैद्यकीय निष्काळजीपणासाठी फौजदारी गुन्हा सिद्ध होण्यासाठी संबंधीत डॉक्टरांनी अत्युच्च किंवा पराकोटीचा निष्काळजीपणा केला आहे, हे फिर्यादीस सिद्ध करावेच लागेल. केवळ 'एरर ऑफ जजमेंट' हे कारण गुन्हा सिद्ध होण्यासाठी पुरेसे नाही.

३. वैद्यकीय व्यावसायिकाकडे योग्य ते (Reasonable) ज्ञान व कौशल्य असणे गरजेचे आहे आणि प्राप्त परिस्थितीमध्ये योग्य ती काळजी घेण्याची जबाबदारी डॉक्टरांवर असते. जेव्हा एखाद्या डॉक्टरचे कृत्य हे त्या विषयातील योग्य ते ज्ञान असलेल्या दुसऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या दर्जाच्या (Standard) खाली असेल, तेव्हाच तो डॉक्टर दोषी असेल.

४.  हल्लीच्या काळात रोग निदान व उपचारपद्धती यांच्यात अनेक प्रकार / निवड स्वातंत्र्य असते. अशा वेळी कुठली पद्धत वापरावी, यामध्ये डॉक्टरांमध्येही मतमतांतरे दिसून येतात. अशा वेळी दुसऱ्या डॉक्टरांनी न स्वीकारलेल्या पद्धतीचा अवलंब केला म्हणून संबंधित डॉक्टर निष्काळजी ठरत नाही.

५. कधी कधी अशी वेळ येते, की डॉक्टरांना अधिक धोका असलेली उपचारपद्धत निवडावी लागते; पण त्यात रुग्णाला अधिक फायदे असतात. अशा वेळी जास्त धोके असलेली पद्धत निवडली म्हणून निष्काळजीपणा झाला म्हणता येणार नाही.

६. जोपर्यंत डॉक्टर आवश्यक त्या ज्ञानाच्या व कौशल्याच्या आधारे त्याचे काम करत आहे, तोपर्यंत त्यास निष्काळजी म्हणता येणार नाही. प्राप्त  परिस्थितीप्रमाणे दोनपैकी एका उपचारपद्धतीचा अवलंब करून जरीडॉक्टरांना यश आले नाही व अशी उपचारपद्धत वैद्यकीय क्षेत्रात सर्वमान्य असेल, तर डॉक्टरांना निष्काळजी म्हणता येणार नाही.

७. डॉक्टरांकडून चांगल्या व प्रामाणिक कामाची अपेक्षा असेल, तर त्यांनाही भयमुक्त व निष्काळजीपणापोटी होणाऱ्या कारवाईच्या टांगत्या तलवारीपासून मुक्त वातावरण उपलब्ध करून दिले पाहिजे. ही जबाबदारी समाजाचीच आहे.

८. बऱ्याच वेळा डॉक्टराविरुद्ध त्यातल्या त्यात खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध व दवाखान्यांविरुद्ध दाखल होणाऱ्या तक्रारी या केवळ डॉक्टरांना छळण्यासाठी व पैसे उकळण्याच्या दुष्ट हेतूने दाखल होतात, असे दिसून आले आहे. अशा खोट्या तक्रारी फेटाळल्याच पाहिजेत.


अर्थात वरील मार्गदर्शक तत्त्वांनंतर सर्वोच्च न्यायालायाने पुढे हेही स्पष्ट केले आहे, की या निकालाचा अर्थ असा अजिबातच नाही, की डॉक्टरांना वैद्यकीय निष्काळजीपणाबद्दल कधीच शिक्षा होऊ शकत नाही. जोपर्यंत डॉक्टर त्यांचे काम प्रामाणिकपणे व सर्वसाधारण मान्यताप्राप्त कौशल्याआधारे करीत आहेत, तोपर्यंत त्यांच्याविरुद्ध कारवाई होऊ शकत नाही.

शेवटी असे सांगावे वाटते, की सर्वच डॉक्टरांना एकच चष्म्यातून बघणे चुकीचे आहे. उडदामाजी काळे-गोरे असणारच. न्यायालयाचा वैद्यकीय निष्काळजीपणा बद्दलचा दृष्टिकोन कायम संयत राहिला आहे. गेल्याच वर्षी डॉ. बलीराम प्रसाद प्रकरणामध्ये न्यायालयाने आत्तापर्यंतची ११ कोटीपेक्षा अधिक अशी सर्वांत जास्त नुकसानभरपाई वैद्यकीय निष्काळजीपणाबद्दल दिली आहे.

या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनीही त्यांचे काम प्रामाणिकपणे करण्यातच भले आहे. या सर्व प्रकरणांच्या वाढीमागे डॉक्टर-रुग्ण यांच्यातील संवाद विश्वास हरवत चालला आहे. हेही एक कारण आहे. असा संवाद व विश्वास पुन्हा वाढीस लागला, तर अंहकारापोटी होणाऱ्या तक्रारी कमी होतील आणि त्यासाठी दोन्हीकडून हात पुढे ... घेणे गरजेचे आहे.

 ॲड. रोहित एरंडे ©

 

Comments

  1. 11000 कोटी पेक्षा जास्त नुकसान भरपाई हे आमच्या समजण्याच्या पलीकडचे जर थोडक्यात सांगाल का?
    आता त्या डॉक्टरांकडे एवढे पैसे नसले तर काय कसं काय चालणार हे पुढे?

    ReplyDelete
  2. राहती जागा नवरा बायको यांच्या पैकी एकाच्या नावाने करायची असेल तर पती-पत्नी यांच्यापैकी एकाच्या नावाने बक्षीस पत्र करायचं असेल तर दोनशे रुपये अधिक एक टक्का एलबीटी म्हटलं तर हा एक टक्के एलबीटी हा कशाचा एक टक्का आहे..?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©