प्राणीप्रेम कायद्यापेक्षा मोठे नाही. ॲड. रोहित एरंडे ©

प्राणीप्रेम कायद्यापेक्षा मोठे होऊ शकत नाही.
ॲड. रोहित एरंडे © 
प्रश्न : आमच्या  सोसायटीमध्ये  आम्ही ज्या फ्लॅट मध्ये राहतो त्याच्या राहणाऱ्या एका सभासदाने त्याच्या  खिडकीमध्ये कबुतरांना दाणा -पाणी देण्यासाठी  , एक ट्रे बसवला आहे.  त्यामुळे आमच्या गच्चीमध्ये   कबुतरांची घाण, पिसे, दाणे असा कचरा होतो. या सभासदांना हा प्रकार थांबविण्यास सांगितला तर ते म्हणतात, हे पुण्याचे काम आहे. दुसऱ्या सभासदाने घरातच २ कुत्रे पाळले आहेत, जे सारखे भुंकत असतात आणि त्याचे मालक त्यांचे अतोनात लाड करतात आणि या प्रेमापोटी जिन्ह्यात केलेली घाण सुध्दा ते नीट साफ करत नाहीत त्यामुले सतत एकप्रकारचा नकोसा वास येत असतो. .   सोसायटी पदाधिकारी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत. या सर्वाचा आम्हाला आणि इतर सभासदांनाही खूप त्रास होत आहे   तरी या बाबत कृपया मार्गर्दशन करावे..
एक वाचक पुणे.

 पु.ल. ज्यांना "पाळंदे" असे मजेने संबोधायचे   असे    प्राणी पाळणारे मोजके लोक आणि इतर सभासद यांच्यामध्ये वादावादी होतेच.
सर्व प्रथम त्या सभासद महाशयांना पुण्य कमवयाचे अजून अनेक चांगले मार्ग आहेत आणि दुसऱ्यांना त्रास देणे हे पापकर्म होत नाही काय ? खरेतर कबुतरे किंवा असे पक्षी हे निसर्गतःच स्वतःचे अन्न  स्वतः शोधू शकतात आणि त्यांना अश्या कृत्रिम पद्धतीने खायला देणे हेच मूलतः चुकीचे आहे असे या क्षेत्रातील   तज्ञ सांगतात. ते असो. पण  कुठलेही प्राणिप्रेम हे कायद्यापेक्षा मोठे होऊ शकत नाही. आपल्या दोन्ही त्रासाचे उत्तर "आपल्या वागणुकीमुळे शेजारच्यांना त्रास होऊ नये" ह्या नागरिक शास्त्रातील अतिशय मूलभूत परंतु महत्वाच्या शिकवणुकीत आहे आणि याचीच भलामण    मा. मुंबई उच्च न्यायालयाने  जिग्नेश ठाकोर विरुद्ध दिलीप शहा , २०१६(६) महा.लॉ  जर्नल , पान क्र. ३७४, मा. न्या. आर. एम . सावंत,)  ह्या निकालात केली आहे.  या निकालात "आपल्या वागणुकीमुळे शेजारच्यांना त्रास होऊ नये" ह्या नागरिक शास्त्रातील अतिशय मूलभूत परंतु महत्वाच्या शिकवणुकीवर शिक्का मोर्तब केले आहे. कबुतरांच्या विष्ठेमुळे घातक प्रकारचे विषाणू पसरून श्वसनाचे घातक   आजार होऊ शकतात हे आता सिध्द झाले आहे आणि हे आजार संबंधित 'पुण्यकर्म' करणाऱ्या सभासदही होऊ शकतात. या बाबतीत पुणे महानगरपालिकेने नुकतेच एक परिपत्रक काढून कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी  अन्न खायला घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे जाहीर केल्याचे    वाचले. 
तसेच एकतर जिन्ह्यात कुत्र्यांनी घाण न करणे याकडे लक्ष देणे आणि केल्यास ती  साफ करणे हि जबाबदारी त्याच्या मालकांवरच आहे. 
' अश्या गोष्टीचा फार इशू न करता शेजार धर्म पळून थोडा त्रास सहन करावा'  हा प्राणीप्रेमी सभासदाचा सल्ला    'पक्ष्यांची घाण खाली लोकांच्या अंगावर पडून त्यांना त्रास होतो' हेच सिध्द  करतो   , असे  उच्च न्यायालयाने  नमूद केले.   
सर्वात महत्वाचे म्हणजे हा त्रास   रोज  होत असल्यामुळे  प्रत्येक दिवशीच दावा दाखल करायला कारण घडत आहे असे म्हणून १० वर्षांनी लावलेला दावा मुदत बाह्य असल्याचा आक्षेपही कोर्टाने फेटाळला  होता. तसेच  "कोणीही आपल्या जागेचा वापर हा दुसऱ्यांना त्रास होईल अश्या पद्धतीने करू शकत नाही". या  पंजाब उच्च न्यायालयाच्या दर्शन राम वि. नजर राम ह्या १९८८ मधील निकालाचाही आधार मुंबई उच्च न्यायालायने घेतला. हा आधार घेताना न्यायालायने १८६८ मधील इंग्लंडमधील हाऊस ऑफ लॉर्ड या कोर्टाने रायलेंन्ड्स वि. फ्लेचर या "Law  of  Torts"  वरील निकालाचा  आधार घेतला.  "उत्तरदायित्व नियम" या तत्वाप्रमाणे आपल्या एखाद्या कृतीमळे दुसऱ्याला नुकसान झाल्यास ते भरून देण्याची जबाबदारी आपल्यावर असते, असे हाऊस ऑफ लॉर्डने नमूद केले आणि आजही हा निकाल अनेक ठिकाणी लागू होतो. 
थोडक्यात प्राणिप्रेम असो किंवा स्वतःची वागणूक, त्याचा  अतिरेक होऊन  दुसऱ्यांना त्रास होता कामा नये असेच या निकालांचे सार  आहे. म्हणूनच हाऊस ऑफ लॉर्डच्या आधीही समर्थांनी द्रष्टेपणाने अज्ञ लोकांच्या लक्षणांमध्ये  'मर्यादेविण पाळी सुणे (श्वान), तो एक...  असे नमूद करून ठेवले आहे. 
प्राणी पाळण्यास कायदयाने बंदी नाही. कित्येक लोकं घरामध्ये कुत्री पाळून त्यांची नीट जबाबदारी घेतात, स्वच्छता पाळतात त्यांचे अनुकरण करणे कधीही चांगले. श्वानाचे लाड मालकाने करावेत मात्र ते  दुसऱ्यांना त्रासदायक बनू नयेत याबाबत दुमत नसावे. या बाबतीत  प्राण्यांच्या एका डॉक्टरांचे विधान मला कायम आठवते "कुत्र्याला   माणूस बनवायचा हट्ट करू नका  आणि तुम्ही कुत्रा  बनू नका'. पक्ष्यांना-प्राण्यांना खायला घालणे  पुण्याचे काम असेलहि , तर नियम न पाळणे हेहि मोठे पाप आहे असेच म्हणावे लागेल.   त्यामुळे  सदरील सभासदाचे वर्तन हे उपविधी ४८ (अ) अन्वये कारवाईस पात्र असून सोसायटीने उपविधी ४८ (बी ) प्रमाणे कारवाई करणे क्रमप्राप्त आहे अन्यथा तुम्हाला नुकसानभरपाई आणि मनाईसाठी दावा करता येईल.  

 ॲड. रोहित एरंडे ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©