वडिलोपार्जित मिळकतीमध्ये मुलींचा समान हक्क आहे. : ऍड. रोहित एरंडे. ©​

 वडिलोपार्जित मिळकतीमध्ये   मुलींचा  समान  हक्क आहे. 

 सर, आम्ही २ बहिणी आणि २ भाऊ आहोत. आमची वडिलोपार्जित मिळकत बरीच आहे. परंतु आम्हा दोन्ही बहिणींचा विवाह १९९४ पूर्वी झाल्यामुळे आता आमचे भाऊ वडिलोपार्जित मिळकतीमध्ये आमचा हक्क उरला  नाही असे सांगत आहेत. ह्या बाबतीत इंटरनेट वर  खूप उलट सुलट माहिती मिळाली. तरी कृपया आम्हाला वडिलोपार्जित मिळकतींमध्ये हक्क आहे का नाही हे सांगावे ?

२ सख्ख्या बहिणी, पुणे. 

आपल्यासारखे प्रश्न आजही अनेक ठिकाणी दिसून येतात. "कायद्यापुढे सर्व समान" ह्या मूलभूत तत्वाला अनुसरून केंद्र सरकारने हिंदू वारसा कायदा १९५६ मध्ये २००५ साली विविध दुरुस्त्या केल्या ज्यायोगे वडिलोपार्जित मिळकतींमध्ये  मुलींना मुलांप्रमाणेच  समान हक्क मिळण्यासाठी कलम ६ मध्ये महत्वाचे फेरबदल केले आणि ही दुरुस्ती अंमलात येण्यासाठी ०९/०९/२००५ (ऑन अँड फ्रॉम|) हि तारीख मुक्रर केली गेली.  मात्र ह्या दुरुस्तीचा अंमल हा पूर्वलक्षी प्रभावाने (रिट्रोस्पेक्टिव्ह ) करायचा का ०९/०९/२००५ या तारखेपासून म्हणजेच प्रोस्पेक्टिव्ह समजायचा यावरून बराच गोंधळ उडाला, त्यातच विविध न्यायालयांचेही  परसपर विरोधी निकाल आले. अखेर सर्व प्रकरणे मा. सुप्रीम कोर्टाच्या  तीन  सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणीसाठी घेतली गेली  आणि त्यावर  विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा (सिविल अपील डायरी क्र . ३२६०१/२०१८, ) या याचिकेच्या निमित्ताने   ११ ऑगस्ट २०२० रोजी मा.न्या.  अरुण कुमार मिश्रा, अब्दुल नजीर आणि एम. आर. शाह ह्यांच्या खंडपीठाने एकमताने निकाल देऊन 'वडिलोपार्जित मिळकतींमध्ये  मुलींच्या समान हक्कांवर शिक्कामोर्तब केले आहे आणि पर्यायाने हि दुरुस्ती पूर्वलक्षी प्रभावाने लागू असल्याचे मान्य  झाले आहे.  

Link of Supreme Court judgment 

https://main.sci.gov.in/supremecourt/2018/32601/32601_2018_33_1501_23387_Judgement_11-Aug-2020.pdf

ह्या दुरुस्तीपूर्वी  महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास हिंदू वारसा कायद्यामध्ये कलम २९अ  घालण्यात आले होते , ज्यायोगे   १९९४ पूर्वी लग्न झालेल्या मुलींना वडिलोपार्जित मिळकतींमध्ये हक्क मिळत नसे . मात्र २००५ च्या केंद्रीय  दुरुस्तीमुळे आणि सदरील सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे सदरील  कलम २९अ हे अप्रभावी झाले आहे आणि त्यामुळे वरील  निकालामुळे  मुलींचा जन्म किंवा लग्न  कधीही  झाले असले तरी त्यांना वडिलोपार्जित मिळकतींमध्ये समान हक्क असणार आहे. त्यामुळे तुम्हाला देखील सदरील मिळकतींमध्ये  समान हक्क आहे. त्यासाठी आधी वकीलांमार्फत नोटीस पाठवून बघा, नाहीतर वाटपाचा दावा करून हिस्सा मागावा लागेल. 


मुलगी हि आयुष्यभर मुलगीच राहते : 

मुलींच्या बाबतीत मिळकतीच्या हक्कांसंदर्भात जो आज पर्यंत भेदभाव केला गेला तो चुकीचा होता आणि  "मुलगा हा लग्न होई पर्यंतच आई-वडिलांचा मुलगा असतो, पण मुलगी हि आयुष्यभर मुलगीच राहते" असे हि सुप्रीम कोर्टाने  पुढे नमूद केले आहे. कोर्टाने एकंदरीतच कोपार्सनरी मिळकत म्हणजे काय , वाटप म्हणजे काय ह्याचा उहापोह आपल्या १२१ पानी निकाल पत्रामध्ये केला आहे.  अखेर मा. सर्वोच्च न्यायालायने प्रकाशच्या केस मधला निकाल पूर्णपणे तर दानम्मा च्या केसमधील निकाल काही अंशाने रद्दबातल ठरवून  मुलींच्या अधिकारावर खालील प्रमाणे शिक्कामोर्तब केले आहे .

१. हिंदू वारसा कायद्याच्या कलम  ६ अन्वये मुलांप्रमाणेच आता  मुली देखील त्यांचा जन्म २००५ च्या आधी किंवा नंतर झाला असला तरी  आता "कोपार्सनर" म्हणजेच सह-हिस्सेदार होतील.

२. अपवाद - दुरुस्त कलम ६(५) प्रमाणे २०/१२/२००४ पूर्वी जर एखादी मिळकत खरेदी, गहाण,बक्षिसपत्र, हक्कसोड पत्र , मृत्यूपत्र इ. दस्तांनी कायदेशीरपणे किंवा रजिस्टर्ड वाटपपत्राने किंवा कोर्टाच्या हुकूमनाम्याने तबदील झाली असेल, तर मात्र  अश्या मिळकतींमध्ये मुलींना समान हक्क मिळणार नाही. तोंडी वाटप पात्र ग्राह्य धरले जाणार नाही. केवळ अपवादत्मक परिस्थितीमध्येच, जेथे तोंडी वाटप पत्र झाले आहे हे सिद्ध करण्यासाठी सरकारी कागदपत्रांचा पुरावा असेल आणि लेखी वाटप पत्राप्रमाणेच त्याची अंमलबजावणी  झाली असेल तेथेच तोंडी वाटप पत्र ग्राह्य धरले जाईल.

३. कलम - ६ मधील नोशनल पार्टीशन हे काही खरोखर पार्टीशन होत नाही आणि त्यामुळे कोपार्सनरी संपुष्टात येत नाही.  वाटपाच्या दाव्यात जरी  प्राथमिक हुकूमनामा झाला असेल तरी अंतिम हुकूमनाम्यामध्ये मुलींना, मुलांप्रमाणेच समान हक्क मिळण्याचा अधिकार राहील.

२००५ हीच लक्ष्मण रेखा मानणारा पूर्वीचा निकाल खरे तर योग्य होता. मात्र ह्या निकालामुळे कोर्ट केसेस मध्ये भरपूर वाढ होण्याची दाट शक्यता असल्याने वरील निकाल टीकेचा धनी झाला आहे.. असो.  तरी सध्या तरी हाच निकाल बंधनकारक आहे. 

अर्थात सर्वात महत्वाचे, वरील निकाल हा केवळ वडिलोपार्जित मिळकतींसाठी लागू आहे, स्वकष्टार्जित मिळकतींसाठी नाही हे लोकांनी कायम ध्यानात ठेवावे कारण  एखाद्या व्यक्तीची स्वकष्टार्जित मिळकत ही त्याच्या नातवंडा - पतवंडांसाठी वडिलोपार्जित होत नाही आणि म्हणून त्यांना अश्या मिळकतीमध्ये जन्मतःच हक्क प्राप्त होत नाही हे मा. सर्वोच्च न्यायालायने आधीच्या अनेक निकालांमध्ये स्पष्ट केले आहे. 


ऍड. रोहित एरंडे. ©​

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©