मृत्युपत्राचा लाभार्थीच आधी मयत झाल्यास.. ॲड. रोहित एरंडे ©

  मृत्युपत्राचा  लाभार्थीच आधी मयत झाल्यास.. 

माझ्या आईने जे विल केले होते त्यामध्ये तिच्या  मिळकतीचे आम्हा ३ बहिणींमध्ये कसे वाटप होईल हे लिहून ठेवले होते. आमचे  वडील अनेक वर्षांपूर्वीच  गेले आहेत.  मात्र माझ्या थोरल्या बहिणीचा  मृत्यू आमच्या आईच्या  हयातीतच झाला आणि त्यानंतर सुमारे २-३ वर्षांनी आमची आई गेली.   आता  जी बहीण आईपूर्वीच  मयत झाली  तिच्या मिळकतीची विभागणी कशी होईल ? तिला  पती आणि २ मुले   आहेत. कृपया मार्गदर्शन करावे 

एक वाचक, ठाणे 

मृत्युपत्र हे करावेच आणि तेही तज्ञ वकीलांकडून करून घ्यावे जेणेकरून आपल्या पश्चात आपल्या  मिळकतीचे विभाजन सुकर होण्यास मदत होईल  हे अनेक लेखांमधून यापूर्वी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मृत्युपत्रासारखी महत्वाची गोष्ट जी आपल्या लाखो -कोटी  रुपयांच्या मिळकतीशी संबंधित असते तिथे मिळकतीच्या किंमतीपुढे  थोडेसे पैसे वाचविण्यासाठी  दुसऱ्याचे मृत्युपत्र कॉपी करून किंवा गूगल वरील अर्धवट माहितीच्या आधारे  मृत्युपत्र केल्यास  याचे त्रासदायक  परिणाम पुढची पिढी भोगू शकते.   भारतीय वारसा कायदा १९२५ मध्ये मृत्युपत्रासंबंधी सविस्तर तरतुदी आहेत आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर  या कायद्याच्या कलम -१०९ मध्ये दडले आहे . या तरतुदीप्रमाणे जर का मृत्यूपत्र करणाऱ्याने त्याची मिळकत लाभार्थी म्हणून त्याच्या मुला -मुलींना (child ) किंवा रेषीय वंशज (lineal descendant ) म्हणजेच नातू, पणतू इ. यांना दिली असेल आणि जर का मृत्यूपत्र करणाऱ्याच्या हयातीमध्येच अश्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाला तर अशी मिळकत हि त्या मयत व्यक्तीच्या रेषीय वंशजांना मिळेल.    पुढे असेही नमूद केले आहे कि  अन्य विरुध्द तरतूद केलेली नसेल, तर अशी लाभार्थी व्यक्ती ही मृत्यूपत्र करणाऱ्याच्या नंतरच मयत झाली असे गृहीत धरले जाईल. 


आपल्या आईच्या  मृत्युपत्रामध्ये जर का लाभार्थी आधीच मयत झाला तर अशी मिळकत कोणाला जाईल हे नमूद केले नसेल असे गृहीत धरून  तुमच्या बहिणीला जी मिळकत मृत्युपत्राने मिळाली असती, ती तिच्या मुलांना -रेषीय वंशज म्हणून  समानरित्या मिळेल, मात्र तिच्या नवऱ्याला (वैवाहिक जोडीदाराला) आणि तुम्हा बहिणींना  देखील काहीही हक्क मिळणार नाही. इथे अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते कि रेषीय वंशंज हि संकल्पना फक्त पुरुषांसाठी मर्यादित नसून इतर सर्व रेषीय वारस म्हणजेच मुलींचा देखील समावेश होईल असा महत्वपूर्ण निर्णय "भिमनाथ मिस्सीर विरुध्द तारा दाई या केसमध्ये प्रिव्ही कौन्सिलने - म्हणजेच ब्रिटिशकालीन सर्वोच्च न्यायालय म्हणता येईल अश्या कोर्टाने १९२१ मध्येच दिला आहे आणि तो आपल्या केसमध्ये चपखलपणे लागू होतो.   

 प्रॅक्टिसमध्ये असा अनुभव  येतो कि  जेव्हा एखादी व्यक्ती  मृत्युपत्राने  मिळकत मुला-मुलीला देतो, तेव्हा समजा मुलगा / मुलगी तुमच्या आधीच मयत झाले तर काय? असा प्रश्न विचारल्यावर पक्षकारांना हा प्रश्न अनपेक्षित असतो आणि आवडत नाही आणि असे कसे होईल ? आमचे वय झाले आहे, मुले तर अजून लहान आहेत अशी स्वाभाविक प्रतिक्रिया त्यांची येते. पपरंतु आयुष्यात कधी काय घडेल याचा नेम नसतो आणि कायद्याला भावना समजत नाहीत.  सबब आपल्या मृत्युपश्चात मिळकतीचे विभाजन करताना समजा लाभार्थीच आधी मयत झाला तर "प्लॅन बी " कायम लिहून ठेवावा  जेणेकरून असे प्रश्न निर्माण होणार नाहीत आणि म्हणूनच तज्ञ व्यक्तींमधून मृत्युपत्र करून घेणे कायमच श्रेयस्कर राहते. 


ॲड. रोहित एरंडे ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©